वक्तव्यांचे परिमाण आणि परिणाम

अमर पुराणिक
आता भारतातील मुस्लिम असुरक्षित असल्याची आवई उठवली जात आहे. सामान्य भारतीय मुसलमान नागरिकच काय तर बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानही असुरक्षित असल्याचा गळा काढला जातोय. त्याच्या सुरक्षेची मागणी पाकिस्तान, आयएसआय आणि सईद सारख्या अतिरेक्याकडून केली जाते. हे बळ कशामुळे आले हे आता वेगळे सांगायला नको. आत त्यांचे हे अनैतिक बळ आणखीन वाढतच जाणार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायात आता भारताला सतत हे ओरडून सांगावे लागणार आहे की, भारत दहशतवादाला खतपाणी घालत नाही. हिंदू दहशतवाद नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही. जन हो, आपली राष्ट्रीय धोरणे हे कॉंग्रेस सरकार आंतरराष्ट्रीय समुदायात पटवून देऊ शकत नाही, समजावून सांगू शकत नाही, तर या गोष्टी समजावून सांगणे या कॉंग्रेसला काय जमणार आहे. शिंदे साहेबांची जीभ सरकली असेल असे सारवासारवीचे विधान कॉंग्रेसकडून माध्यमाद्वारे करून यावर एकवेळेस पांघरुण घातले जाईलही, पण जागतिक समुदायात हे पटवून देऊ शकणार का?
रायपूर येथे झालेल्या कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरात केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘संघ-भाजपाच्या शिबिरांमध्ये हिंदू दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते’, असे अविचारी आणि प्रक्षोभक विधान केले. देशात जातीय शांतता आणि सलोखा कायम ठेवण्याची जबाबदारी पार पाडण्याचे कर्तव्य विसरून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देशात हिंदू आणि मुस्लिम अशी उभी फूट पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सर्व स्तरांतून होत आहे. शिंदे इतके बोलून थांबले नाहीत तर, रा. स्व. संघ आणि भाजपाच्या शिबिरांमध्ये हिंदू दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असते आणि बॉम्बस्फोट करून ते मुस्लिमांना बदनाम करीत असतात, असे धक्कादायक विधानही शिंदे यांनी कॉंगे्रसच्या चिंतन शिबिरात केलेे. समझोता एक्स्प्रेस, मक्का मशीद आणि मालेगाव येथील बॉम्बस्फोटात हिंदू दहशतवाद्यांचाच हात असल्याचे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या टिप्पणीने सार्‍या देशात संतापाची लाट उसळली. नंतर मात्र जनक्षोभाच्या भीतीने त्यांनी घुमजाव करत मी ‘हिंदू दहशतवाद’ असे म्हणालोच नाही तर ‘सफ्रॉन टेररिझम’ असे म्हणाल्याची सारवासारव केली. या दोन्ही शब्दांत फरक असला तरी साधारणपणे अर्थ सारखाच होतो.
सुशीलकुमार शिंदे हे एका जबाबदार देशाचे जबाबदार गृहमंत्री असून, ते आपली जबाबदारी विसरले. मुळात परराष्ट्र धोरण नावाची चिज शिल्लक नसलेल्या संपुआ सरकारने कमीत कमी देशांतर्गत गोष्टीबाबत तरी योग्य, राष्ट्रपोषक व संयमित विधाने करायला हवीत. कमीत कमी विरोधी राष्ट्रांच्या हतात आयते कोलीत मिळणार नाही याचा तरी विचार करणे गृहमंत्र्यांकडून अपेक्षित असते. राजकीय मतभेदातून शिंदे असे बोलले असे म्हणण्याचे कारण नाही. कारण ते कॉंग्रेसचे नेते असले तरी आता देशाचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी वाढते. हे विसरून जर शिंदे असे बेछूट आरोप करत असतील, तर मात्र त्यांना राष्ट्रहितापेक्षा सत्ता ताब्यात ठेवण्याची चिंता सतावतेय असे म्हणावे लागेल.
एकटे शिंदेच नाहीत तर या आधीचे गृहमंत्री आणि आताचे अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनीही सन २०१० मध्ये अशीच बेजबाबदार विधाने केली होती. कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह हे तर कायम अशी वाह्यात विधाने करीत असतात. शिंदे यांच्या या विधानावर कॉंगे्रसचे नेते मणिशंकर अय्यर यांनीही शिंदे यांच्या मताशी सहमती दर्शवत त्यांनी वादात तेल ओतण्याचा प्रयत्न केला. प्रखर राष्ट्रभक्त असलेले भाजपा-संघ परिवार या विधानावर संतप्त होणे साहजिकच आहे. भाजपा-संघाने यावर शिंदेच्या हकालपट्टीची मागणी केली. भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांनी भगवा हा वैराग्याचे प्रतीक असून, आतंकवादाच्या विरोधात आहे. भगवा आमची परंपरा आहे, भगवा ही भारतीय संस्कृती आणि त्यागाचे प्रतीक आहे, असे असताना सुशीलकुमार शिंदे अशी विधाने करतात, त्यांनी समस्त देशवासीयांचा अपमान केला असून, देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली. संघ-भाजपा हिंदू दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे ते सांगतात. मग, थेट पुरावे सादर का करीत नाहीत? त्यांना कोणी अडवले आहे. जर पुरावे नसतील तर शिंदे तरी कोठून पुरावे आणणार.
दूसर्‍या बाजूला या विधानाने देशाचा क्रमांक एकचा शत्रू पाकिस्तान आणि आतंकवादी मात्र प्रचंड खुष झाले आहेत. सुशीलकुमार शिंदे हे आता आतंकवाद्यांचे लाडके झाले आहेत. त्यांना जमात-उल-दावाने या विधानाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याने शब्बासकी दिली आहे. शिंदे साहेबांचे ‘श्री’ हफिज सईद ‘यांच्या’ आनंदाला तर पारावार राहिलेला नाही. हा नराधम सईद म्हणतोय की, ‘सुशीलकुमार शिंदे का यह बयान एक दम सच है|’ हाफिज सईद म्हणतो शिंदे यांचे हे विधान म्हणजे अल्लाहकडून ही पाकिस्तानला मदत आहे. एवढेच नव्हे तर भारत पाकिस्तानवर इतकी वर्षे विनाकारण दहशतवादाचे खोटे आरोप करत आहे. याला म्हणतात आपणहून आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेणे! आंतरराष्ट्रीय स्थरावर हे अतिरेकी आता पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत नसून भारत घालतोय हे ओरडून सांगायला मोकळे झाले. नव्हे तसे ते आता शिंदेंच्या विधानामुळे गळा फाडून सांगू लागले आहेत.
आपलेे हे वक्तव्य खर्‍या दहशतवाद्यांचे मनोबल वाढविणारे आणि पाकप्रायोजित दहशतवादाला प्रोत्साहन देणारेच असल्याचा विचारही गृहमंत्र्यांनी हे विधान करण्यापूर्वी केला नाही. त्यांचे हे वक्तव्य राष्ट्रीय सुरक्षेसाठी अतिशय धोकादायक असून, केवळ राजकीय स्वार्थासाठी देशाचे गृहमंत्री असूनही मुस्लिमांच्या गठ्ठा मतांवर डोळा ठेवून हिंदू आणि मुस्लिमांत तणाव निर्माण करण्याचा आणि देशातील शांतता आणि जातीय सलोखा भंग करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न शिंदे यांनी केला आहे. यातून खर्‍या दहशतवाद्यांना पकडण्याची ताकद आपला देश अशा गृहमंत्र्यांमुळे गमावून बसला आहे. सीमेवर पाकिस्तानचे सैनिक आणि अतिरेकी भारतीय हद्दीत घुसखोरी करतात. हे सिमोल्लंघन सततच सुरूच असते. भारतीय जवानांचा शिरच्छेद करून एका जवानाचे शिर पळवून नेतात आणि आपले सरकार व कॉंगे्रस पक्ष पाकिस्तानशी चर्चाच करतोय, क्रिकेट सामने खेळतोय हे लांच्छनास्पद आहे. या घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळते, मात्र आपले सरकार, गृहमंत्री आणि पंतप्रधान एक शब्दही बोलले नाहीत. मुस्लिम मतांच्या लांगूलचालनात राष्ट्रहिताचे धिंडवडे हा कॉंग्रेस पक्ष काढतोय.  मुस्लिमांचे लाड पुरविणार्‍या आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणार्‍या कॉंगे्रस पक्षाने सत्तेवर येताच, पोटासारखा प्रभावी कायदा रद्द करून दहशतवाद्यांना हैदोसासाठी देश मोकळा करून दिला.
इतकेच नव्हे तर आता भारतातील मुस्लिम असुरक्षित असल्याची आवई उठवली जात आहे. सामान्य भारतीय मुसलमान नागरिकच काय तर बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानही असुरक्षित असल्याचा गळा काढला जातोय. त्याच्या सुरक्षेची मागणी पाकिस्तान, आयएसआय आणि सईद सारख्या अतिरेक्याकडून केली जाते. हे बळ कशामुळे आले हे आता वेगळे सांगायला नको. आत त्यांचे हे अनैतिक बळ आणखीन वाढतच जाणार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायात आता भारताला सतत हे ओरडून सांगावे लागणार आहे की, भारत दहशतवादाला खतपाणी घालत नाही. हिंदू दहशतवाद नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही. जन हो, आपली राष्ट्रीय धोरणे हे कॉंग्रेस सरकार आंतरराष्ट्रीय समुदायात पटवून देऊ शकत नाही, समजावून सांगू शकत नाही, तर या गोष्टी समजावून सांगणे या कॉंग्रेसला काय जमणार आहे. शिंदे साहेबांची जीभ सरकली असेल असे सारवासारवीचे विधान कॉंग्रेसकडून माध्यमाद्वारे करून यावर एकवेळेस पांघरुण घातले जाईलही, पण जागतिक समुदायात हे पटवून देऊ शकणार का? हाच एक मुद्दा धरून पाकिस्तान, आयएसआय, अतिरेकी आपल्या देशाला नाचवू लागले तर मग मात्र अवघड होऊन बसेल. एवढ्या एका मुद्द्याने असे होणार नाही हे आम्हालाही कळते. पण अशी सतत विपरित विधाने करून पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राला भारताविरुद्ध जागतिक मत खराब करण्यासाठी रेकॉर्ड निर्माण करू दिले जाता कामा नये.
भ्रष्टाचार, बलात्कार आणि विकासशून्य अशा धोरणांमुळे यावेळी जनता कॉंग्रेसला धोबीपछाड देणार हे आता निश्‍चितच आहे. निवडणुका जवळ आलेल्या पाहून या पक्षाला पुन्हा एकदा गरीब आणि मध्यमवर्गीयांची आठवण झाली आहे. कॉंग्रेस पक्ष या वर्गांना नेहमीच धोका देत आलेला, आधीची आश्‍वासने पूर्ण न करणारा कॉंगे्रस पक्ष त्यांना आता नवे स्वप्न दाखवीत आहे. पंतप्रधान, सोनिया गांधी तर धडधडीत ‘आम्ही सर्व अश्‍वासने पूर्ण केली असे सांगत आहेत. या बेजबाबदार विधानाबद्दल शिंदे आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागायला हवी होती, पण शिंदे यांनी हायकमांडला खुष करण्यासाठी हे विधान केले असून, या मागे कॉंग्रेसचे मतांचे राजकारण आहे. कॉंग्रेसचे चिंतन शिबीर ‘चिंतनासाठी नव्हे, तर राहुल गांधींना युवराजपदाचा राज्याभिषेक करण्यासाठी आणि कॉंग्रेस नेते, कार्यकर्ते यांच्या गळी राहुलचे नेतृत्व उतरवण्यासाठी हे शिबीर घेतले होते. 
तरुण भारत, आसमंत, दि. ०३ फेब्रूवारी २०१३.

0 comments:

Post a Comment