This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
भाष्य - मा. गो. वैद्य
गेल्या शनिवारी म्हणजे दि. १५ सप्टेंबर २०१२ ला माजी सरसंघचालक श्री सुदर्शनजी यांचे रायपूरला निधन झाले. कुप्पहळ्ळी सीतारामय्या सुदर्शन असे त्यांचे पूर्ण नाव. ते जन्माने मराठी भाषी असते, तर हेच नाव सुदर्शन सीतारामय्या कुप्पहळ्ळीकर असे झाले असते. त्यांचे मूळ गाव कर्नाटकातील कुपहळ्ळी. सीतारामय्या हे त्यांचे वडील.
सार्थकता आणि धन्यता
दिनांक १८ जून १९३१ हा त्यांचा जन्मदिन आणि १५ सप्टेंबर २०१२ हा त्यांचा मृत्युदिन. म्हणजे वयाची ८१ वर्षे त्यांनी पूर्ण केली होती. त्यामुळे, त्यांचे अकाली निधन झाले असे म्हणता यावयाचे नाही. पण कोण किती जगला, यापेक्षा कसा जगला, हे महत्त्वाचे असते. अनेक महापुरुषांनी फारच लवकर आपली जीवनयात्रा संपविलेली आहे. आद्य शंकराचार्य, संत ज्ञानेश्‍वर, स्वामी विवेकानंद ही त्यातली लक्षणीय नावे. एक जुनी लोकोक्ती आहे. जीवनाचे मर्म ती सांगते. ती आहे- ‘‘विना दैन्येन जीवनम्, अनायासेन मरणम्’’ लाचारी न पत्करता जगणे आणि कुणालाही त्रास न देता, अगदी स्वत:ही त्रास न सोसता, मृत्यूला कवटाळणे, यात जीवनाची सार्थकता आहे अणि मृत्यूचीही धन्यता आहे. सुदर्शनजींचे जीवन या जीवनसार्थकतेचे आणि मरणधन्यतेचे उदाहरण आहे.
स्पृहणीय मरण
लाचारी न पत्करता जीवन जगणे, हे बरेचसे आपल्या हाती आहे. आपण ठरवू शकतो की, मी असेच ताठ मानेने जगणार. मग संकटांचे पहाड कोसळले तरी पर्वा नाही. अनेकांनी असे ठरवून जीवन व्यतीत केले आहे. पण मरण? ते थोडेच आपल्या हाती असते? सुदर्शजींनी मात्र असे मरण स्वीकारले की जणू काही त्याला त्यांनी विशिष्ट वेळेला आमंत्रित केले होते! सकाळी पाच-साडेपाचला उठून फिरायला जाणे हा त्यांचा नित्यक्रम होता. सुमारे तासभर फिरून आल्यावर ते प्राणायामादि आसने करीत. दिनांक १५ सप्टेंबरलाही ते असेच फिरायला गेले होते. बहुधा ६.३० च्या सुमारास त्यांनी प्राणायामाला आरंभ केला असणार; आणि ६.४० ला त्यांनी मृत्यूला कवटाळले. खरेच, कुणीही अशा मरणाचा हेवा करावा, असे ते अक्षरश: स्पृहणीय होते.
संघशरण जीवन
सुदर्शनजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. ‘प्रचारक’ शब्दाचा अर्थ, इतरांना उलगडून सांगणे कठीण असते, असा माझा अनुभव आहे. मी संघाचा प्रवक्ता असताना, अनेक विदेशी पत्रकार मला त्या शब्दाचा नेमका अर्थ विचारीत. मी तो सांगू शकत नसे. मी वर्णन करी. तो पूर्णकालिक असतो. अविवाहित असतो. त्याला कुठलेच मानधन मिळत नाही; आणि जेथे सांगितले व जे सांगितले, तेथे, ते काम त्याला करावे लागते. असा अर्थ मी सांगीत असे. खरेच ‘प्रचारक’ शब्दाचे एवढे अर्थायाम आहेत. सुदर्शनजी प्रचारक होते. ते सुविद्य होते. सुमारे ५७-५८ वर्षांपूर्वी त्यांनी बी. ई.ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. तीही त्या काळी नवीन असलेल्या ‘टेलिकम्युनिकेशन्स’ म्हणजे दूरसंचार या विषयात. चांगल्या पगाराची, चांगल्या सन्मानाची नोकरी, त्यांच्या समोर हात जोडून उभी राहिली असती. पण सुदर्शनजी त्या वाटेने जाणारे नव्हते. ती वाट पकडायची नाही आणि आपले संपूर्ण जीवन संघसमर्पित करावयाचे, हे त्यांनी पूर्वीच ठरविलेले असणार. म्हणून ते ‘प्रचारक’ बनले. संघाच्या दृष्टीने यात काही अप्रूप नाही. आजही संघाचे अनेक प्रचारक उच्च पदवीविभूषित आहेत. अनेक प्रचारक पीएच. डी. आहेत. एक माझ्या माहितीतल्या प्रचारकाचे संशोधन आण्विक रसायनशास्त्राशी संबंधित आहे. एम. बी. ए. आहेत. एमबीबीएस आहेत. बी. ई. व एम्. ई. ही आहेत. मजेची गोष्ट ही आहे की, एवढी महान् अर्हता प्राप्त केलेल्या या मंडळींना आपण काही अद्वितीय अथवा अभूतपूर्व करीत आहोत, असे वाटतही नाही; आणि कुणी सांगितले नाही तर इतरांना ते कळावयाचेही नाही. प्रचारक बनून सुदर्शनजींनी आपल्या जीवनाचा एक मार्ग पत्करला. हा संघशरण जीवनाचा म्हणजेच, समाजशरण जीवनाचा म्हणजेच, राष्ट्रशरण जीवनाचा मार्ग होता. तो जो त्यांनी एका क्षणी स्वीकारला, त्या मार्गावर ते शेवटच्या श्‍वासापर्यंत चालत राहिले.
‘प्रज्ञाप्रवाहा’चे जनक
संघाच्या कार्यपद्धतीची जी काही वैशिष्ट्ये आहेत, त्यात शारीरिक व बौद्धिक या दोन विधांचा अंतर्भाव आहे. सुदर्शनजी दोन्ही विधांमध्ये पारंगत होते. अनेक वर्षेपर्यंत, तृतीय वर्षाच्या संघ शिक्षावर्गांमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. ते अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुखही झाले होते. सरसंघचालक झाल्यानंतरही, ते जेव्हा संघ शिक्षावर्गाच्या मैदानावर उपस्थित राहात, तेव्हा विशिष्ट अवघड प्रयोग स्वत: करून दाखविण्याचा त्यांना संकोच नसे. नव्हे, ते त्याचा आनंदही घेत. थोड्या वेळासाठी का होईना, आपण सरसंघचालक आहोत, हे ते विसरून जात आणि एक गणशिक्षक बनून जात. जसे शारीरिक विधेत तसेच बौद्धिक विधेतही. ते अखिल भारतीय बौद्धिक प्रमुखही झाले. त्याच काळात, ‘प्रज्ञाप्रवाह’च्या क्रियाकलापांना आकार आला व शिस्तही लागली. निरनिराळ्या प्रांतांमध्ये मौलिक बौद्धिक चिंतनाचे काम निरनिराळ्या नावांनी चालत असे. आताही चालत असावे. प्रतिदिनच्या शाखेशी याचा संबंध नसे. पण, राष्ट्र, राज्य, धर्म, संस्कृती, साम्यवाद, समाजवाद, राष्ट्रवाद, इत्यादी मौलिक अवधारणांच्या संबंधात जे प्रचलित विचार आहेत, त्यांचा मूलगामी परामर्श घेऊन, या संकल्पानांचा खरा अर्थ प्रतिपादन करणे, हे या बौद्धिक क्रियाकलापांचे उद्दिष्ट असे. त्याचप्रमाणे, तात्कालिक प्रचलित विषयांचाही परामर्श या कार्यक्रमांतून घेतला जाई. ‘प्रज्ञाप्रवाह’ही या सर्वांना आश्रय देणारी, त्यांच्यावर सावली धरणारी, एक विशेष छत्री होती आणि या छत्रीचे मार्गदर्शक होते सुदर्शनजी.
सरसंघचालकाची नियुक्ती
प्रथम छत्तीसगडमध्ये, नंतर मध्य भारतात प्रांतप्रचारक या नात्याने, त्यानंतर आसाम, बंगाल या भागात क्षेत्रप्रचारक या नात्याने, अनुभवांची समृद्धी लाभलेले ते, पुढे संघाचे सहसरकार्यवाह बनले; आणि इ. स. २००० मध्ये ते सरसंघचालक या सर्वोच्च पदावर अधिष्ठित झाले.
संघाच्या घटनेप्रमाणे, सरसंघचालकांची नियुक्ती होते. ती नियुक्ती पूर्व सरसंघचालक करतात. त्या नियुक्तीच्या पूर्वी, काही ज्येष्ठ सहकार्‍यांशी ते विचारविनिमय करीत असतात. आद्य सरसंघचालक डॉ. के. ब. हेडगेवार यांनी श्री मा. स. गोळवलकर उपाख्य गुरुजी यांची नियुक्ती केली होती. डॉक्टरांचे एक जुने सहकारी श्री आप्पाजी जोशी, यांनी आपल्या एका लेखात, या संबंधी डॉक्टरांनी त्यांना विचारले होते, असे लिहिले आहे. १९३९ साली, संघाच्या कार्यपद्धतीचा पुनर्विचार करण्यासाठी, वर्धा जिल्ह्यातील सिंदी येथे, तत्कालीन प्रमुख संघ कार्यकर्त्यांची जी बैठक झाली होती, त्यावेळी डॉक्टरांनी आप्पाजींना विचारले होते. श्रीगुरुजींनी आपला उत्तराधिकारी ठरविताना कुणाशी विचारविनिमय केला होता हे मला माहीत नाही. पण श्री बाळासाहेब देवरस यांची नियुक्ती करण्याचे पत्र त्यांनी लिहून ठेवले होते; व ते तत्कालीन महाराष्ट्र प्रांत संघचालक श्री ब. ना. भिडे यांनी वाचून दाखविले होते. माझे भाग्य हे की, त्यानंतरच्या तिन्ही सरसंघचालकांनी म्हणजे श्री बाळासाहेब देवरस, प्रो. राजेंद्रसिंह आणि श्री सुदर्शनजी यांनी या नियुक्तीच्या संदर्भात माझेही मत जाणून घेतले होते. अर्थात्, एकट्या माझे नाही. अनेकांचे. सुदर्शनजींनी तर निदान २०-२५ जणांशी परामर्श केला असावा. डॉक्टरांच्या मृत्यूनंतर गुरुजींची घोषणा झाली. गुरुजींच्या मृत्यूनंतर बाळासाहेबांच्या नियुक्तीचे पत्र वाचण्यात आले. पण नंतरच्या तिन्ही सरसंघचालकांनी आपल्या हयातीतच आपल्या उत्तराधिकार्‍याची नियुक्ती घोषित केली. १९४० पासून म्हणजे जवळजवळ पाऊणशे वर्षांपासून हा क्रम अगदी सुरळीत चालू आहे. ना कुठे वाद ना मतभेद. हेच संघाचे संघत्व आहे. याचा अर्थ विशिष्ट पदासाठी एकच व्यक्ती योग्य असते, असा करण्याचे कारण नाही. अखेरीस, कोणतीही नियुक्ती हा व्यवस्थेचाच भाग असतो. पण पदासाठी योग्यता असावीच लागते. १९७२ साली श्रीगुरुजींवर कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली असताना, एका विदेशी महिला पत्रकाराने, मला विचारले होते (त्यावेळी मी तरुण भारताचा मुख्य संपादक होतो) Who after Golwalkar? मी म्हणालो, असे अर्धा डझन तरी लोक असतील! तिला आश्‍चर्य वाटले. ती म्हणाली, ‘‘आम्हाला ती नावे माहीत नाहीत.’’ मी म्हणालो, ‘‘तुम्हाला माहीत असण्याचे कारण नाही. आम्हाला माहीत आहेत.’’
निर्मळ व निर्भय
सन २००० मध्ये तत्कालीन सरसंघचालक प्रो. राजेंद्रसिंहजी यांनी सुदर्शनजींची सरसंघचालकपदी नियुक्ती केली. नऊ वर्षे ते त्या पदावर राहिले; आणि आपल्या हयातीतच तो पदभार श्री मोहनजी भागवत यांच्यावर सोपवून ते मोकळे झाले. सुदर्शनजी स्वभावाने निर्मळ होते. थोडे भोळे म्हटले तरी चालेल. आपल्या मनात जे आहे, ते प्रकट करण्याचा त्यांना संकोच नव्हता. जणू काही त्यांचे अंत:करण तळहातावर ठेवल्यासारखे सर्वांसाठी खुले होते. कुणाच्याही सांगण्याने ते प्रभावित होत असत. काही प्रसारमाध्यमे याचा गैरफायदाही घेत असत. पण त्याची त्यांना पर्वा नसे. ते जसे निर्मळ होते, तसेच निर्भयही होते. कुणाशीही चर्चा करण्याची त्यांची तयारी असे; आणि मानापमानाचाही ते विचार करीत नसत.
अल्पसंख्य आयोगापुढे
एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. २००१ मध्ये संघाने एक व्यापक जनसंपर्काचे अभियान निश्‍चित केले होते. मी त्यावेळी दिल्लीत संघाचा प्रवक्ता होतो. काही लोकांशी दिल्लीच्या संघ कार्यकर्त्यांनी माझ्या भेटी ठरविल्या होत्या. त्यात, सध्याचे प्रधानमंत्री डॉ. मनमोहनसिंग, दक्षता आयुक्त एल. विठ्ठल, मुख्य निवडणूक आयुक्त एम. एस. गिल, नावाजलेल्या पत्रकार तवलीनसिंग, आऊटलुकचे संपादक, (बहुधा विनोद मेहता हे त्यांचे नाव असावे) आणि अल्पसंख्य आयोगाचे उपाध्यक्ष सरदार तरलोचनसिंग (त्रिलोचनसिंग) यांच्या भेटी मला आठवतात. एक गिलसाहेब सोडले, तर बाकी सर्व भेटी, त्या त्या व्यक्तींच्या कार्यालयात न होता, घरी झाल्या होत्या. तरलोचनसिंगांनी शीख आणि हिंदू यांच्या संबंधात खोदून खोदून मला विचारले. माझ्याबरोबर बहुतेक सर्व ठिकाणी त्यावेळचे दिल्ली प्रांताचे संघचालक श्री सत्यनारायण बंसल असत. माझ्या बोलण्याने तरलोचनसिंगांचे समाधान झाले असावे, असे दिसले. ते म्हणाले, ‘‘हे जे तुम्ही माझ्या घरात बोलत आहात, ते अल्पसंख्य आयोगापुढे बोलाल काय?’’ मी म्हणालो, ‘‘आमची हरकत नाही.’’ त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला वेळ दिली. आम्हीही इंग्रजी भाषेत एक लेखी निवेदन तयार केले व ते आयोगाला दिले. काही प्रश्‍नोत्तरे झाली. बाहेर पत्रकारांचा तांडा उभा होता. त्यांनीही आडवेतिडवे प्रश्‍न विचारायला सुरवात केली. तरलोचनसिंग म्हणाले, ‘‘यांच्या निवेदनाने माझे समाधान झाले आहे. तुम्ही का उगाच अकांडतांडव करता?’’
कॅथॉलिकांशी संवाद
या अल्पसंख्य आयोगात जॉन जोसेफ (की जोसेफ जॉन) या नावाचे ख्रिस्ती सदस्य होते. ते केरळीय होते. ते म्हणाले, ‘‘तुम्ही ख्रिस्ती धर्मगुरूंशी बोलाल काय?’’ मी होकार दिला. त्यांनी या बाबीचा पाठपुरावा केला. ते संघाच्या झंडेवाला कार्यालयात मला दोनदा भेटायला आले. त्याप्रमाणे रोमन कॅथॉलिक चर्चच्या प्रमुखांशी बोलण्याचे निश्‍चित झाले. त्यांच्या दोन अटी होत्या. (१) त्यांच्याबरोबर प्रॉटेस्टंट ख्रिश्‍चन असणार नाहीत (२) आणि त्यांचे बिशप, प्रवक्त्याशी वगैरे बोलणार नाही. संघाच्या सर्वोच्च नेत्यांशीच बोलतील. मी सुदर्शनजींशी संपर्क साधला. ते तयार झाले. दोघांच्या सोयीने दिनांक व वेळ ठरली. अन् बैठकीला दोन-तीन दिवस उरले असताना चर्चकडून निरोप आला की, संघाच्या अधिकार्‍याला आमच्या चर्चमध्येच चर्चेसाठी यावे लागेल. चर्च नाही, संघाचे कार्यालयही नाही, अशा तटस्थ ठिकाणी भेट व्हावी, असे जॉन जोसेफ यांच्याशी बोलण्यात ठरले होते. मला कॅथॉलिक चर्चच्या या अटीचा राग आला आणि मी म्हणालो, बैठक रद्द झाली असे समजा. सुदर्शनजी केरळमध्ये प्रवासावर होते. दुसरे दिवशी दिल्लीला यावयाचे होते. मी त्यांच्या कानावर झालेला प्रसंग सांगितला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘जाऊ की आपण त्यांच्या चर्चमध्ये!’’ मीच चकित झालो. लगेच मी जॉन जोसेफ यांना सांगितले. त्याप्रमाणे सुदर्शनजी, मी आणि महाराष्ट्र प्रांताचे तत्कालीन कार्यवाह डॉ. श्रीपती शास्त्री असे आम्ही तिघे कॅथॉलिक चर्चमध्ये गेलो. आमचे चांगले औपचारिक स्वागत झाले. तेथे झालेल्या चर्चेसंबंधी येथे सांगणे अप्रस्तुत आहे. तो वेगळा विषय आहे. सुदर्शनजी चर्चेला भीत नसत, हे मला येथे अधोरेखित करावयाचे आहे.
नंतर प्रॉटेस्टंट पंथीय धर्मगुरूंशी बैठक झाली. ती नागपुरातील संघ कार्यालयात, डॉ. हेडगेवार भवनामध्ये झाली. प्रॉटेस्टंटांच्या चार-पाच उपपंथांचीच नावे मला माहीत होती. पण या बैठकीला २७ उपपंथांचे २९ प्रतिनिधी आले होते. दीड तास त्यांच्याशी खेळीमेळीत चर्चा झाली. सर्वांनी संघ कार्यालयात भोजनही केले.
मुस्लिम राष्ट्रीय मंच
मुसलमानांशीही त्यांचे अनेकदा बोलणे झाल्याचे माझ्या कानावर होते. पण त्या बोलण्यात मी त्यांच्याबरोबर नव्हतो. या संपर्कातूनच ‘मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या’ स्थापनेचा जन्म झाला. या मंचाच्या संघटनेचे श्रेय संघाचे ज्येष्ठ प्रचारक, जम्मू-काश्मीर प्रांताचे माजी प्रांतप्रचारक आणि विद्यमान संघाच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य इंद्रेशकुमार यांचे आहे. पण सुदर्शनजी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले होते. ‘मुस्लिम राष्ट्रीय मंचाची’ जेवढी म्हणून अखिल भारतीय शिबिरे किंवा अभ्यासवर्ग आयोजित असत, त्यांना सुदर्शनजी आवर्जून उपस्थित राहात. मुसलमानांना त्यांचे सांगणे असे की, ‘‘तुम्ही बाहेरून हिंदुस्थानात आलेले नाहीत. इथलेच आहात. तुमची उपासनापद्धती तेवढी वेगळी आहे. तुमचे पूर्वज हिंदूच आहेत. त्यांचा अभिमान बाळगा. या देशाला मातृभूमी माना. हिंदूंप्रमाणे आपणही येथील राष्ट्रीय जीवनाचे अभिन्न घटक आहोत, असे तुम्हाला वाटू लागेल.’’ या मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या कार्यक्रमांमुळे मुसलमानांच्या मध्येही हिंमत आली. देवबंदच्या पीठाने ‘वंदे मातरम्’ न म्हणण्याचा फतवा काढला, तर या मंचाने अनेक ठिकाणी ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन केले. सर्व प्रकारचे धोके पत्करून जम्मू-काश्मीरच्या राजधानीत श्रीनगरमध्ये मंचाने तिरंगा फडकविला आणि वंदे मातरम्चे गायन केले. एवढेच नव्हे, तर १० लाख मुसलमानांच्या सह्यांचे एक निवेदन राष्ट्रपतींना सादर करून संपूर्ण देशात गोहत्याबंदी व्हावी अशी मागणी केली. अलीकडेच म्हणजे गेल्या जून महिन्यात राजस्थानातील पुष्कर या तीर्थक्षेत्री या मुस्लिम मंचाचे तीन दिवसांचे राष्ट्रीय शिबिर संपन्न झाले होते. सुदर्शनजी त्या शिबिरात उपस्थित होते. सुदर्शनजींना, त्यांच्या मृत्यूनंतर जे अनेक मुस्लिम नेते श्रद्धांजली अर्पण करायला आले होते, त्याचे हे कारण आहे.
तृतीय सरसंघचालक श्री बाळासाहेब देवरस यांनी काही नव्या चांगल्या प्रथा संघात पाडल्या. त्यातली एक म्हणजे रेशीमबागेला सरसंघचालकांची स्मशानभूमी बनू दिले नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर- म्हणजे आम जनतेसाठी असलेल्या घाटावर, झाला होता. सुदर्शनजींचाही अंत्यसंस्कार तेथेच झाला. तो दिवस होता रविवार १६ सप्टेंबर २०१२. एक संघसमर्पित जीवन त्या दिवशी संपले. खरेच ते संपले म्हणावयाचे? नाही. फक्त शरीर संपले. ते अग्नीने भस्मसात् केले. पण असंख्य आठवणी व प्रेरणाप्रसंग कायम ठेवून.
श्री सुदर्शनजींच्या स्मृतीला माझे विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली.
• रमेश पतंगे
‘मेरा मुझ में कुछ नही, जो कुछ है सब तेरा|
तेरा तुझको सोप दे, क्या लागे है मेरा|’
अशी मनोवृत्ती बनवावी लागते. खरं म्हणजे बनवावी लागते हे म्हणणेही बरोबर नाही. सरसंघचालक हे या भावनेचे मूर्तिमंत रूप असते. सुदर्शनजी असे होते. ते समष्टिरूप झाले होते. म्हणूनच त्यांच्या वागण्या-बोलण्या-चालण्यात-रोजच्या व्यवहारात अगदी सहजता असे. त्यांची भेट घेत असताना आदरयुक्त  भीती असे. परंतु, त्यांच्यापासून दूर जावे असे कुणाला वाटत नसे. खर्‍या अर्थाने ते आधारवड होते. सर्वांवर शीतल छाया धरणारे होते. ही छाया आता गेली आहे. परंतु, शीतलता मात्र तशीच कायम राहणार आहे. अशा प्रज्ञाचक्षू सुदर्शनजींना ही आदरांजली...


सुदर्शनजी गेल्याची बातमी शनिवारी सकाळी समजली आणि मन सुन्न झाले. डोक्यावरील कृपाछत्र गेल्याची तीव्रपणे जाणीव झाली. एकामागोमाग एक प्रसंग डोळ्यापुढे उभे राहू लागले. संघाची ऐकीव आणि पुरोगामी माहिती असणार्‍या मंडळींना संघातील सरसंघचालक पद हे गूढ वलय असलेले पद वाटते. प्रत्येक जण आपापल्या कल्पना रंगवून त्याचे वर्णन करतो. कुणी सरसंघचालकांना संघाचे गुरू म्हणतात, तर दुसरा कुणी त्यांना संघपरिवारातील महान शक्तिमान व्यक्ती म्हणतात. त्यांच्या आदेशाशिवाय संघ आणि संघसंस्थाजीवनाचे पान हालत नाही, असा एक गोडसमज अनेकांचा असतो. काही लोकांना तर सरसंघचालक म्हणजे संघाचे हुकूमशहा वाटतात. मा. सुदर्शनजी २००९ पर्यंत सरसंघचालक होते. ते कसे होते? म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते?
‘सा. विवेक’तर्फे आम्ही ‘अमृतपथ’ या नावाचा, महाराष्ट्रातील संघकार्याचा इतिहास मांडणारा एक ग्रंथ तयार केला. अशा प्रकारचे काम हे पहिल्यांदा होत होते. संघाची पद्धती, प्रसिद्धीच्या झोतात न राहण्याची आहे. त्यामुळे कार्यकर्ते आपल्या कामाचा डांगोरा पिटत नाहीत. परंतु, आपल्या मागच्या पिढीने कोणत्या परिस्थितीत संघकाम केले? त्यांच्या पुढील आव्हाने कोणती होती? हे नव्या पिढीला समजणे फार आवश्यक आहे. म्हणून ‘अमृतपथ’ ग्रंथ करण्याचे काम विवेकने हातात घेतले.
ग्रंथाचे प्रकाशन मा. सुदर्शनजींच्या हातून व्हावे असे ठरले. तेव्हाचे संघाचे प्रांतप्रचारक मुकुंदराव पणशीकर यांना तसे मी सांगितले. त्यांचे सुदर्शनजींशी बोलणे झाले. परंतु, काहीतरी समजुतीत घोटाळा झाला आणि सुदर्शनजी येणार नाहीत, असा निरोप आमच्याकडे आला. त्यानंतर मी तेव्हाचे सरकार्यवाह मोहनजी भागवत यांच्याशी बोललो आणि त्यांची तारीख नक्की केली. तशा पत्रिका छापल्या आणि एके दिवशी विमल केडिया यांचा मला फोन आला. ते म्हणाले, ‘‘मी आजच दिल्लीहून आलो आहे आणि मा. सुदर्शनजी म्हणत होते की, ‘अमृतपथ’ ग्रंथ प्रकाशनासाठी मी मुंबईला येणार आहे.’’ विमलजींचे बोलणे ऐकून मी हादरलोच. मोठी गडबड झाल्याचे माझ्या लक्षात आले. मी सुदर्शनजींना फोन केला तेव्हा ते दिल्लीच्या संघकार्यालयात होते. (सरसंघचालकांशी थेट दूरध्वनीवरून संवाद करता येतो.) त्यांना सर्व परिस्थिती सांगितली आणि काहीतरी घोटाळा झाल्याचे त्यांना सांगितले. ते हसले आणि म्हणाले, ‘‘अरे! चिंता करू नकोस, कार्यक्रमात बदल करू नकोस. मोहनजी येत आहेत ना? मग त्यांच्याच हस्ते प्रकाशन करून घे.’’ आणि हा विषय संपला. कसली खळखळ नाही, रागावणे नाही, नियोजन नीट करता येत नाही का? असले बोल नाहीत. असे होते सुदर्शनजी.
त्यांची माझी शेवटची भेट ऑगस्ट महिन्यात बंगळूरला झाली. मी बंगळूरला जाण्यापूर्वीच दोन दिवस अगोदर ‘सुदर्शनजी गायब झाले आहेत,’ अशा ब्रेकिंग न्यूज सकाळच्या वार्तापत्रात झळकत होत्या. दोन तासांनंतर समजले की, त्यांचे अपहरण झाले नसून, सकाळी फिरायला गेले असता ते वाट चुकले आणि खूप थकून एका घरात विश्रांती घेत होते. बंगळूरच्या संघकार्यालयात त्यांची माझी भेट झाली. नेहमीच्या आपुलकीने त्यांनी विचारले- ‘‘कधी आलास? कोणता कार्यक्रम होता?’’ माझ्या येण्याचे प्रयोजन मी त्यांना सांगितले. ते म्हणाले, ‘‘कृष्णप्पा आजारी आहेत. (संघाचे ज्येष्ठ प्रचारक) त्यांना भेटून ये.’’ कृष्णप्पांशी गप्पा मारत असताना निरोप आला, सुदर्शनजी जेवायला थांबले आहेत. जेवायला बोलावले आहे.
त्यांच्या शेजारीच माझे पान मांडले होते. त्यांच्याबरोबर जेवण्याचा हा शेवटचा प्रसंग असेल, असे तेव्हा मला वाटले नाही. पानात सर्व तांदळाचे पदार्थ होते. सुदर्शनजी म्हणाले, ‘‘अरे, त्याला पोळी, पुरी वाढा. तो काय भातखाऊ नाही.’’ सरसंघचालक घरातील वडीलधार्‍या माणसाप्रमाणे असतात. सर्वांची सहजपणे काळजी घेतात. आल्यागेल्याची वास्तपुस्त करतात. त्यांच्या गरजांकडे लक्ष देतात. म्हणून कार्यकर्त्यांना सरसंघचालक कधीही महान नेते, त्यांच्याविषयी भीती वाटावी असे वाटत नाहीत. ते श्रद्धेचे स्थान असते. आपुलकीचे स्थान असते.
सुदर्शनजी विद्वान होते. त्यांचे वाचन अफाट होते. बारीकसारीक विषयांचे संदर्भ ते गोळा करीत. विवेकच्या एका दिवाळी अंकात ‘तथागत आणि श्रीगुरुजी’ यांच्यावर मी एक लेख लिहिला होता आणि या लेखासाठी धर्मानंद कोसंबी यांचे समाधिपाद हे पुस्तक संदर्भासाठी घेतले होते. लेखात त्यांचा उल्लेख आहे. सुदर्शनजींनी लेख वाचला. त्यांना तो खूप आवडला आणि लगेच त्यांनी समाधिपाद हे पुस्तक मागवून त्याचे वाचन करून  टाकले. वेगवेगळ्या राष्ट्रीय समस्यांवरील त्यांचे बौद्धिक वर्ग म्हणजे समस्या जाणून घेण्याच्या ज्ञानाचा खजिना असे. पंजाबची समस्या, आसामची समस्या, मिशनर्‍यांचे प्रश्‍न अशा बहुविध विषयांवरील त्यांचे बौद्धिक वर्ग एक एक समस्या मुळापासून उलगडून दाखविणार्‍या असत. तसे ते ज्ञानसागर होते.
ज्ञानामुळे व्यक्ती अहंकारी होते. श्रेष्ठ बौद्धिक क्षमतेमुळेदेखील अहंकार आणखी वाढतो. आपला जन्म दुसर्‍याला ज्ञान देण्यासाठीच झाला आहे, कुणाचे ऐकण्यासारखे काही नाही, अशी विद्वान माणसांची धारणा होते. यांचे अनुभव मी भरपूर घेतले आहेत. परंतु, सुदर्शनजी त्याला अपवाद होते. ‘फळभाराने वृक्ष वाकतो, म्हणजे नम्र होतो.’ म्हणून तुकोबाराय म्हणाले की, ‘नम्र झाला भूतां, त्याने कोंडिले अनंता|’ सुदर्शनजींची नम्रता थक्क करणारी आहे.
पुण्याला दामूअण्णा दाते यांच्या ‘स्मरणशिल्पे’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता. मा.  सुदर्शनजींच्या हस्ते प्रकाशन होते. पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात होता. पहिल्या रांगेत माजी सरसंघचालक रज्जुभय्या बसले होते. सुदर्शनजी मला म्हणाले, ‘‘पुस्तकाची पहिली प्रत रज्जुभय्यांना नेऊन दे.’’ मी तसे केले. याच कार्यक्रमात त्यांनी एक विषय मांडला की, ज्येष्ठ संघस्वयंसेवकांनी आपल्या आठवणी लिहाव्यात. भावी पिढीसाठी त्या आवश्यक आहेत आणि भाषणाच्या ओघात त्यांनी  ‘मी, मनु आणि संघ’ या पुस्तकाच्या संदर्भातला करुणानिधींचा किस्सा सांगितला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांना भाजपाचे तेथील कार्यकर्ते गोपालन यांनी पुस्तकाची तामीळ प्रत दिली. करुणानिधींनी ते पुस्तक वाचून काढले. पुन्हा भेट झाली असता गोपालन यांनी करुणानिधींना  विचारले, ‘‘तुम्हाला ‘मी, मनु आणि संघ’ पुस्तक कसे वाटले?’’ करुणानिधी म्हणाले, ‘‘या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे संघ जर आहे, तर संघावर टीका करण्यात आयुष्याची चाळीस वर्षे आम्ही वाया घालविली, असे म्हणावे लागेल.’’ असे कौतुक करायला मनाचा फार मोठेपणा लागतो. खरं म्हणजे आमच्यासारखे कार्यकर्ते सुदर्शनजींसारख्यांच्या जीवनातून संघ समजून घेत असतात. असे म्हणतात की, एखाद्या मोठ्या वृक्षाखाली अन्य झाडं वाढू शकत नाहीत, परंतु सुदर्शनजी असे वृक्ष होते की, ज्यांच्या शीतल छायेखाली सामान्य कुवतीचे कार्यकर्तेही मोठे होत गेले.
मनाची निर्मळता हा सुदर्शनजींच्या व्यक्तिमत्त्वाचा विलोभनीय पैलू होता. त्यांचे मन गंगाजलासारखे निर्मळ आणि पवित्र होते. त्यात एक बालसदृश निर्मळता होती. लहान मूल जसे सदा आनंदी, सदा प्रसन्न असते, तशी प्रसन्नता सुदर्शनजींकडे होती. दोन वर्षांपूर्वी भोपाळच्या संघकार्यालयात मी त्यांना भेटायला गेलो. त्यांच्याबरोबर जेवण झाले आणि नंतर ते  मला घेऊन बसले. ऊर्जेचे विविध स्रोत या विषयाच्या त्यांनी काही फाइल्स तयार केल्या होत्या. त्या मला दाखवीत बसले. पर्यायी ऊर्जा मिळविण्याचे कुठे कुठे कसे प्रयत्न चालू आहेत, त्याची माहिती त्यांनी मला दिली. ती सर्वच माहिती मला खूप नवीन होती. आपले  ज्ञान प्रकट करण्यासाठी सुदर्शनजी हे मला सांगत नव्हते, तर ऊर्जेचे संकट कसे दूर करता येईल, हा त्यांच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय होता.
अगदी छोट्याशा जागेतदेखील (जमिनीत) भाजीपाल्याचे भरपूर उत्पादन कसे घेता येईल, त्यासाठी प्लांटिंग कसे करावे, जैविक खते कोणती वापरावी, गोविज्ञानाचा उपयोग कसा करावा याची सचित्र माहिती त्यांनी मला दिली. ती ऐकून  मी अचंबित झालोच, पण आणखी अचंबित करणारी गोष्ट मला पाहायची होती. सुदर्शनजी मला कार्यालयाच्या गच्चीवर घेऊन गेले. या गच्चीवर कारली, दुधी, पालक, वांगी अशा विविध भाज्यांची लागवड केलेली होती आणि सुदर्शनजी मोठ्या अभिमानाने सांगत होते की, गेले सहा महिने आम्ही याच भाज्या खात आहेत. एका विश्‍वव्यापी संघटनेचे प्रमुख राहिलेले सुदर्शनजी, मर्यादित जागेत भाजीपाल्याची लागवड कशी करावी, स्वयंपूर्ण कसे व्हावे, ऊर्जा कशी निर्माण करावी, याचे व्यावहारिक प्रात्यक्षिक मला दाखवीत होते. वेगळ्या भाषेत हिंदू राष्ट्र म्हणजे काय आणि त्याच्या किती अंगांचा आपण विचार केला पाहिजे, हे न बोलता, कोणतेही भाषण न देता ते करून दाखवीत होते. सगळ्या वागण्या-बोलण्यामध्ये निर्व्याज सहजता होती. आपुलकी होती.
चार-पाच वर्षांपूर्वी राष्ट्रजीवनातील विविध विषयांच्या अभ्यासबैठकांची सत्रे सुरू होती. समरसता या विषयाची अशीच महत्त्वपूर्ण बैठक नागपुरात होती. चिंतनासाठी मोजकेच कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. एका सत्रात समरसता या विषयावरील बीजभाषण मला करायचे होते. भाषण मी लिहून काढले होते. त्यातील एक मुद्दा असा होता की, राष्ट्रीय स्तरावर सामाजिक क्षेत्रात अनेक कळीचे विषय निर्माण होतात. संघाची भूमिका अशा वेळी स्पष्ट असावी लागते. ही भूमिका सरसंघचालक किंवा सरकार्यवाह यांनी  मांडणे आवश्यक असते. माझ्यापुढे प्रश्‍न होता की, सुदर्शनजींच्या उपस्थितीत हा विषय मांडावा की मांडू नये? ते काय म्हणतील? मी श्रीपती शास्त्रींना माझी अडचण सांगितली. ते म्हणाले, ‘‘ही बैठक मोकळेपणाने विचार मांडण्यासाठी आहे. तेव्हा तू जरूर विचार            
मांड.’’ मी टिपणातील विषय मांडला. सुदर्शनजी मला नंतर खाजगीत असे म्हणाले नाहीत की, ‘‘काय रे तू सरसंघचालकांनादेखील अक्कल शिकवितोस का?’’ त्यानंतर  महू येथे  पू. डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमात त्यांचे, बाबासाहेबांवर अप्रतिम भाषण झाले आणि त्यात त्यांनी अनेक सामाजिक प्रश्‍नांचा ऊहापोह केला. योग्य व्यासपीठावर योग्य वेळी त्यांनी आपले विचार मांडले.
सरसंघचालक संघाचे सर्वोच्च प्रमुख असतात. याचा अर्थ ते मन मानेल तसा संघ चालवू शकत नाहीत. ते संघमनाचे प्रतिनिधित्व करतात आणि संघमन आपल्या भाषणातून प्रकट करतात. सरसंघचालक होण्यासाठी संघमनाशी एकरूप व्हावे लागते आणि त्यासाठी स्वत:च्या अहंकाराचा संघात विलोप करावा लागतो. यालाच आत्मविलोप असे म्हणतात. ‘मेरा मुझ में कुछ नही, जो कुछ है सब तेरा| तेरा तुझको सोप दे, क्या लागे है मेरा|’ अशी मनोवृत्ती बनवावी लागते.  खरं म्हणजे बनवावी लागते हे म्हणणेही बरोबर नाही. सरसंघचालक हे या भावनेचे मूर्तिमंत रूप असते. सुदर्शनजी असे होते. ते समष्टिरूप झाले होते. म्हणूनच त्यांच्या वागण्या-बोलण्या-चालण्यात-रोजच्या व्यवहारात अगदी सहजता असे. त्यांची भेट घेत असताना आदरयुक्त  भीती असे. परंतु, त्यांच्यापासून दूर जावे असे कुणाला वाटत नसे. खर्‍या अर्थाने ते आधारवड होते. सर्वांवर शीतल छाया धरणारे होते. ही छाया आता गेली आहे. परंतु, शीतलता मात्र तशीच कायम राहणार आहे...
---------------------------
दिव्य ध्येयासाठी समर्पित
•दिलीप धारूरकर
केंद्रात आणि अनेक राज्यात हिंदुत्त्वाचा विचार मानणारा राजकीय पक्ष सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झालेला असताना आणि हिंदुत्त्वाचा विचार देशातील वैचारिक चर्चेत केंद्रस्थानी असताना ते सरसंघचालक झाले होते. अशा काळात संघटनेला जी दिशा दिली पाहिजे त्यासाठी त्यांनी सतत चिंतन आणि मार्गदर्शन केले. सत्ता हे अंतिम साध्य नसून समाजपरिवर्तन आणि देशाला परमवैभवाप्रत घेऊन जाणे हे अंतिम साध्य आहे याची जाणीव सतत सर्वांना राहील याबाबत ते सतर्क होते. वैचारिक संघर्ष हा आता महत्त्वाचा आहे असे सांगून  वैचारिक संघर्षासाठी सर्वांनी तयार असले पाहिजे असे ते सांगत असत. प्रसारमाध्यमांच्या भूमिकेची समीक्षा त्यांच्या बोलण्यातून अत्यंत प्रखरपणे आणि देशहिताचा संदर्भ देऊन सतत घडत असे. गुजरातमधील दंगलीत एका ठिकाणी आग लागली तर दिवसभर तोच तो धूर दाखवत टीव्ही वाहिन्यांनी भयावह चित्र कसे उभे केले, भारतीयत्वाचा विचार देणारे प्रसंग, घटना यांना माध्यमांनी कसे महत्त्व दिले पाहिजे हे सांगताना ते अतिशय आग्रही होत असत. 

जीवनासाठी उच्च ध्येय आणि उच्च ध्येयासाठी संपूर्ण जीवनाचे समर्पण हे कसे असते ते जगून दाखविणारे अधुनिक युगातील कर्तव्यकठोर तपस्वी म्हणजे कुपहळ्ळी सीतारामय्या सुदर्शनजी! वयाच्या नवव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेचे स्वयंसेवक झाल्यानंतर हळूहळू ध्येय साकारत गेले. हा देश परमवैभवाला घेऊन जाण्याचे संघाचे ध्येय हेच आपल्या जीवनाचे ध्येय मानून त्यासाठी सर्वस्व समर्पणाचा संकल्प त्यांनी केला. १९५४ साली वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी संघासाठी सर्वस्व समर्पणाचा विचार करून संघाचा पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम सुरू केले. वास्तविक त्या काळात टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या तरुणांना चांगले करिअर करण्याची संधी होती. आपले भवितव्य आणि देशाचे भवितव्य हे वेगळे असूच शकत नाही असे मानून आपल्या करिअरपेक्षा राष्ट्रीय चारित्र्यनिर्मितीला प्राधान्य देण्याची आणि त्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याची उत्कटता त्यांच्याकडे होती. राष्ट्रकार्याला प्राधान्य देऊन तेच जीवनाचे ध्येय ठरलेले असल्याने त्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याचा निग्रह त्यांनी केला. मग जिल्हा प्रचारक, विभाग प्रचारक अशा जबाबदार्‍या पार पाडत दहा वर्षांत ते प्रान्तप्रचारक या पदापर्यंत पोहोचले. नंतर पूर्वांचलातही क्षेत्र प्रचारक म्हणून त्यांना जबाबदारी दिली गेली. हा सगळा सुदर्शनजींचा जीवनपट सर्वांना माहिती आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता, स्वतःची विश्‍लेषणात्मक दृष्टी, प्रचंड वाचन, जबरदस्त स्मरणशक्ती, अमोघ वक्तृत्त्व अशा अनेक गुणांचा समुच्चय त्यांच्या  व्यक्तिमत्त्वात होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शारीरिक विभाग आणि बौद्धिक विभाग असे दोन विभाग शाखेच्या कार्यक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी यासाठी काम करत असतात. या दोन्ही विभागात गती असणारे स्वयंसेवक फारच दुर्मिळ असतात. सुदर्शनजी हे अशा दुर्मिळ स्वयंसेवकांपैकी होते. शारीरिक कार्यक्रमातील सर्व विषयात ते पारंगत होते आणि बौद्धिक विषयातही त्यांची मोठी तयारी आणि व्यासंग होता. त्यामुळे संघाच्या इतिहासात अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख आणि अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख अशा दोन्ही पदांवर राहिलेले आणि सक्षमपणे दोन्ही जबाबदार्‍या पार पाडणारे ते एकमेव कार्यकर्ते होते. त्यानंतर सहसरकार्यवाह झाले आणि रज्जूभैय्या यांनी आपल्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्यानंतर सरसंघचालकपदाची जबाबदारी सुदर्शनजी यांच्याकडे सोपविली.
सुदर्शनजी यांचे व्यक्तिमत्त्व एखाद्या तपस्वीसारखे होते. त्यांच्या असंख्य आठवणी आज मनात दाटल्या आहेत. ते जेव्हा अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख होते तेव्हा मी एका जिल्ह्याचा बौद्धिक प्रमुख होतो. जिल्हा बौद्धिक प्रमुखांची मुंबईत बैठक होती. संघात बौद्धिक कार्यक्रम म्हणजे शाखेतील पद्य, बोधकथा, सुविचार, सुभाषित, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे बौद्धिक वर्ग इतकेच असे आमचा समज होता.  या बैठकीत सुदर्शनजी यांचे सत्र झाले. त्यांनी संघाच्या शाखेत स्वयंसेवकांची संख्या कशी वाढेल हे सांगताना आठवी, नववी, दहावी या वर्गातील वयोगट असलेल्या मुलांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि या वयोगटातील स्वयंसेवकांसाठी त्यांना आकर्षित करतील, त्यांच्या भावविश्‍वाला आवाहन करतील असे कार्यक्रम आयोजित करावेत असे सांगितले. या प्रकारचे कार्यक्रम कसे असावेत याची दहापेक्षा अधिक उदाहरणे अगदी बंदुकीतून गोळ्या सुटाव्यात तशा गतीने त्यांनी सांगितली. अखंड भारताचा नकाशा मैदानावर आखावा, एकेका स्वयंसेवकाने भारताच्या इतिहासातील वैभवशाली कार्य करणार्‍या एकेका महापुरुषाच्या  ठिकाणावर उभे राहून हातात मशाल घेऊन जावे. त्या महापुरुषाची थोडक्यात माहिती द्यावी, असे करत करत एकेका प्रान्तातील एक-दोन महापुरुषांची माहिती देत संपूर्ण देशाचा नकाशा भरून जावा. नंतर सर्वांनी भारताच्या नकाशाच्या सीमेवर उभे राहून भारत मातेचा जयजयकार करावा. असे कितीतरी उपक्रम त्यांनी सुचविले. आम्ही थक्क झालो. याच बैठकीत थक्क होण्याची वेळ पुन्हा लगेच आली. दोन सत्रांच्या मधल्या वेळेत कोणाला तरी शोधत मी चाललो होतो. स्नानगृहातून कपडे धुण्याचा आवाज आला. सहज डोकावले तर तेथे सुदर्शनजी आपले कपडे धुण्यात मग्न झालेले होते. संघातील शब्देविण संवादे ही व्यक्तिमत्त्व विकासाची जी प्रक्रिया असते तिचे असे अनुभव मनावर कोरले जात असतात. सुदर्शनजी सहसरकार्यवाह असताना मी काही कामानिमित्त दिल्लीला गेलो होतो. झंडेवाला कार्यालयात गेलो. अटलजी सरकारने केलेल्या पोखरणच्या अणुचाचणीबाबत मी दिवाळी अंकासाठी मुलाखती घेण्यासाठी तेथे गेलो होतो. सुदर्शनजी यांची भेट घेतली. ते म्हणाले, उद्या जेएनयूमध्ये याच विषयावर माझे आणि डॉ. मुरलीमनोहर जोशी यांचे भाषण आहे. तिथे चल. आमची भाषणे टेप करून घे. मध्ये मध्ये तुझे प्रश्‍न टाक म्हणजे झाली मुलाखत. तुझ्या काही प्रश्‍नांची उत्तरे भाषणातून मिळाली नाही तर नंतर चहापान आहे तेव्हा तेवढेच विचारून घे. मी जेएनयूमध्ये येतो असे म्हणताच विनाविलंब ते म्हणाले तिकडे कशाला जातोस. इकडेच ये. येथून माझ्याबरोबरच चल. माझी म्हणजे आपल्या तरुण भारतच्या एका आवृत्तीच्या संपादकाची ते कशी काळजी करतात हे त्यातून डोकावत होते. त्यांची ही आत्मीयता मनाला
 उभारी देणारी होती. आमचे हे संभाषण चालू होते तेव्हा माझ्याशी बोलत बोलत त्यांनी आपला स्वतःचा गणवेश अतिशय काळजीपूर्वक बाहेर काढला. त्यातल्या पट्ट्याला पॉलिश केले. पदवेश म्हणजे काळे बूट बाहेर काढून त्यावर पॉलिश केले. मी कुतूहल म्हणून विचारले. सुदर्शनजी गणवेशाची तयारी कशाकरिता करत आहात? ते शांतपणे म्हणाले, अरे, या झंडेवालामध्ये एक शाखा लागते. तिचा आज गणवेश दिन आहे. मग गणवेश तयार करायला नको? संघात कितीही मोठ्या पदावर असलो तरी आपण ज्या शाखेत जातो तिथे स्वयंसेवकच असतो, त्यामुळे तिथल्या सगळ्या आज्ञा, नियम, कार्यक्रम यांचे अनुसरण एक स्वयंसेवक म्हणून काटेकोरपणे केले पाहिजे याचा हा  वस्तुपाठ कधीही विसरता येणार नाही असा होता.
सुदर्शनजी सरसंघचालक झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा मराठवाड्यात नांदेड येेथे खालसा पंथाच्या त्रिशताब्दीनिमित्त प्रवास होता. देवगिरी तरुण भारतसाठी त्यांची मी मुलाखत घ्यावी असे ठरले. मी नांदेडला पोहोचलो. तेथे विभाग कार्यवाह यांच्याशी बोलणे झाले. वारंगा फाटा येथे त्यांचे स्वागत होणार आहे. तेथे मी जावे आणि तेथून नांदेडपर्यंत त्यांच्या गाडीतच बसून यावे. येताना त्यांची मुलाखत गाडीतच पूर्ण करावी असे ठरले. मी टेपरेकॉर्डर वगैरे तयारी करून वारंगा फाटा येथे गेलो. स्वागत, परिचय, चहा पान झाले. सुदर्शनजी यांनी गाडीत बसताना मला पाहिले. चल बैस असे म्हणताच मी गाडीत बसलो. आता मुलाखत नक्की असे मला वाटले. मी त्यांना गाडीत बसताच त्याबाबत बोललो तेव्हा ते म्हणाले, हे बघ, माझा हा प्रवास शाखेच्या कामासाठी आहे. यात मुलाखत, पत्रकार परिषद काही नाही. तुला माहिती आहे ना? असे म्हणून ते पुढे लगेच म्हणाले -
वृत्तपत्र में नाम छपेगा, पहनेंगे  स्वागत समुहार
छोड चलो यह क्षूद्र भावना, हिंदू राष्ट्र के तारणहार॥
माझे बोलणेच खुंटले. अन्य खूप गप्पा झाल्या. तरुण भारतची त्यांनी बारकाईने चौकशी केली. मुलाखत अर्थातच झाली नाही.
संभाजीनगरमध्ये तीन दिवसांची बैठक होती. सुदर्शनजी मार्गदर्शन करणार होते. त्या दरम्यान तीन दिवसात केव्हातरी त्यांची वेळ घेऊन मी सविस्तर मुलाखत तरुण भारतच्या दिवाळी अंकासाठी घ्यायची असा प्रयत्न चालू होता. प्रान्त प्रचारकांनी मला सांगितले की तुम्हाला वेळ दिली आहे. त्यांचा निवास डॉ. तुपकरी यांच्या घरी आहे. आज रात्रीच्या जेवणानंतर मुलाखतीसाठी तेथे तुम्हाला सुदर्शनजी मुलाखत देतील. मी ठरलेल्या वेळेपेक्षा थोडे आधीच डॉ. तुपकरी यांच्या घरी पोहोचलो. सुदर्शनजी यांचे जेवण संपत आले होते. गप्पा मारत जेवण चालू होते. डॉ. अश्‍विनीकुमार, डॉ. जयंत तुपकरी , दोघांच्याही डॉक्टर पत्नी, तुपकरींच्या भगिनी डॉ. मधुश्री सावजी व मेव्हणे डॉ. संजीव सावजी असे सहा डॉक्टर्स तेथे जेवता जेवता गप्पांत सहभागी झालेले. मीही गप्पा ऐकण्यात सहभागी झालो. विषय चालला होता हृदयरोग! सुदर्शनजी त्यांच्या वाचण्यात देशी, विदेशी लेखकांच्या लेखनात हृदयरोगावरचे उपचार, वेगवेगळे घरगुती उपाय, अनुभव असे जे त्यांच्या वाचनात होते ते सुदर्शनजी सांगत होते. कुठे कोणाला तिखट खाल्ल्याने कसा फायदा झाला, कोठे भोपळ्याचा रस सेवन करून हृदयविकारावर कसा फायदा झाला असे वेगवेगळे विषय त्या सांगण्यात होते. जेवण संपून हात वाळून गेले तरी त्यांचे सांगणे चालूच होते आणि सर्व डॉक्टर्स आणि मी ऐकण्यात रंगून गेलो होतो. चौफेर वाचन, भारतीय उपचार पद्धती, भारतीय आयुर्वेद यातील उपायांबाबत विश्‍वास असे अनेक विषय त्यात डोकावत होते. जेवणापेक्षाही या श्रवणभक्तीने तृप्त करणारा तो अनुभव होता.
डेहराडून येथे देशभरातील हिंदुस्थान समाचारच्या प्रतिनिधींची दोन दिवस बैठक होती. सुदर्शनजी बैठकीत पूर्णवेळ उपस्थित होते. बातमी लेखनावर चर्चा चालू होती. शीर्षकामध्ये संक्षिप्त रूपे वापरून वाचकांना कोड्यात टाकू नये असे सांगत असताना माझ्याकडून उदाहरण म्हणून एक इंग्रजी शब्द उच्चारताच सुदर्शनजींनी लगेचच त्याचा हिंदी प्रतिशब्द सांगितला आणि शीर्षकात इंग्रजी शब्दही असता कामा नयेत असे तात्काळ सांगितले. इंडिया मानसिकता आणि भारत मानसिकता असे ते नेहमी आपल्या विवेचनात फरक सांगत. स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कृती याबाबत अत्यंत अग्रही भूमिका ते मांडत असत. गोपाल, भारतीय तंत्रज्ञान आणि भारतीय विज्ञान या संदर्भात त्यांचा गाढा अभ्यास होता. त्याबाबत ते अत्यंत आग्रहाने उदाहरणांसह विवेचन करत. बौद्धिकामध्ये कवितांच्या ओळी,  जोशपूर्ण समारोप अशी वैशिष्ट्ये असत. भलेही राजकीय पक्ष, भारतीय जनता पक्ष यांच्या चुकलेल्या भूमिकेविषयी ते कठोरपणे टीका करत, मात्र आपल्या भाषणात अटलजींच्या कवितेतील ओळींचा वापर करून आत्मीयतेचा एक धागा कसा आहे ते नकळत सांगून जात.
दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवनभर अविचल चलता है|
अशा एका संघगीताच्या ओळी आहेत. सुदर्शनजींचे जीवन या ओळींचे जणू प्रात्यक्षिकच होते. ते शेवटपर्यंत  दिव्य ध्येयाकडे अविचल राहून सतत त्यासाठी चालत राहिले. ज्या रायपूरमध्ये त्यांचा जन्म झाला त्याच रायपूरमध्ये नित्यनेमाप्रमाणे फिरायला जाऊन आल्यानंतर प्राणायाम करत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. रायपूर ते रायपूर असा हा ध्येयनिष्ठेचा अविचल प्रवास प्रत्येकाला हे राष्ट्र परमवैभवाला नेण्याच्या दिव्य ध्येयासाठी काम करण्याची प्रेरणा देणारा आहे. त्याच्या स्मृती जागवत हत्तीचे बळ अंगी घेऊन लाख संकटांना सामोरे जात लवकरात लवकर हे दिव्य ध्येय गाठण्यासाठी सर्वजण कृतीबद्ध होतील यात शंका नाही ! तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!
सुधीर पाठक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रत्येक सरसंघचालक हे एक आगळेवेगळे रसायन राहते. प्रत्येकाच्या जीवनातील उद्दिष्ट एकच होते, ते म्हणजे हिंदू राष्ट्र या विचाराचा प्रभाव समाजावर पडला पाहिजे. पण, प्रत्येकाच्या कार्यकाळात ज्यावर त्यांनी भर दिला असे उपविषय मात्र एका सूत्रातील असले, तरी त्यात भिन्नता होती. डॉ. हेडगेवारांनी संघाची स्थापना केली आणि १९३९ च्या ओ. टी. सी.त त्यांना अखिल भारताचे एक मिनी रूप बघता आले. श्रीगुरुजींनी तर डॉक्टरांनंतर जवळजवळ तीन दशके विभिन्न अडीअडचणी आणि संकटे यावर मात करत संघाला एक भरपूर स्थायित्व मिळवून दिले. श्रीगुरुजींची बैठक ही आध्यात्मिक बैठक होती, तर श्री. बाळासाहेब देवरसांनी ‘सेवा है यज्ञकुंड, समिधासम हम जले’ हा मंत्र दिला. रज्जुभय्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक वैज्ञानिक होते. त्यांनी त्या कृतिपरतेला एक वेगळा आयाम दिला होता. सुदर्शनजी यांनी या कृती प्रत्यक्षात आणून सामाजिक समरसता वेगळ्या अर्थाने प्रस्थापित केली. ते स्वत: दीक्षाभूमीवर गेलेत आणि त्यांनी ख्रिश्‍चन आणि मुसलमान यांच्या प्रतिनिधींना संघकार्यालयात आमंत्रित केले.
सुदर्शनजींच्या जीवनात रेशीमबागला एक वेगळेच महत्त्व होते. त्यांची अंत्ययात्राही त्याच रेशीमबागमधून सुरू झाली होती, ज्या रेशीमबागमध्ये त्यांनी १० मार्च २००० अनुभवला होता. त्या दिवशी प्रतिनिधिसभेत व्यासपीठावर दोन खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. रज्जूभय्या अन् सुदर्शनजी त्या खुर्च्यांवर बसले होते. त्याच दिवशी रा. स्व. संघाचे पाचवे सरसंघचालक म्हणून सुदर्शनजींच्या नावाची घोषणा झाली होती. याच रेशीमबाग परिसरात सरसंघचालक म्हणून त्यांनी पहिला प्रणाम स्वीकारला होता. त्याच दिवशी या परिसराला लक्षात आले होते, एरव्ही इतरांबरोबर बोलतबोलत वा आपल्या विचारात असणारे सुदर्शनजी- फार झपझप चालत ध्वजापावेतो जात असत. ते काही क्षण हे फक्त एका राष्ट्रवादी-हिंदुत्ववादी अ.भा. संघटनेचे रा.स्व. संघाचे प्रमुख म्हणून तेच राहत असत.
सुदर्शनजींनी आपल्या पूर्वसुरींचे ऋण, श्रेय कधीच अमान्य केले नाही, पण आपला स्वतःचा असा वेगळा बाज निर्माण केला होता. सुदर्शनजी सरसंघचालक झाल्यावर एक दिवस संघकार्यालयातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे कार्यवाह श्री. सदानंदजी फुलझेले यांना फोन गेला की, सुदर्शनजी दीक्षाभूमीवर दर्शनाला येत आहेत. क्षणभर त्यांचा आपल्या कानांवर विश्‍वासच बसला नाही. त्यांना माहीत होते, तृतीय सरसंघचालक श्री. बाळासाहेब देवरस यांचे पुण्यातील वसंत व्याख्यानमालेतील भाषण- ‘‘जर अस्पृश्यता वाईट नसेल, तर या देशात काहीच वाईट असू शकत नाही.’’ पण, स्वतः सरसंघचालक दीक्षाभूमीवर येतील, असे त्यांना कधीच वाटले नव्हते. पण, तो क्षण प्रत्यक्षात आला होता. ‘‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही,’’ हे सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दीक्षाभूमीवर धम्मचक्रप्रवर्तन केले होते. आपल्या लाखो अनुयायांसह याच दीक्षाभूमीवर बौद्धधर्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर राजकारणात एक शक्ती म्हणून बौद्धधर्मीय रिपब्लिकन पक्ष उभा राहिला. प्रत्यक्ष व्यवहारातील अनुभव काहीही असला, तरी राजकारणापायी प्रत्येक दलित नेता ब्राह्मणत्वाचे प्रतीक म्हणून संघाला शिव्याशाप घालून आपली मतपेटी मजबूत करून जात असे. रा. स्व. संघाने त्याबद्दल कधीही वैषम्य व्यक्त केले नाही. संघजीवनात तर जातीला स्थानच नव्हते. बाजूला फक्त स्वयंसेवक राहत असे. तो कोणत्या जातीचा आहे, याची विचारपूसही कधी होत नसे. सुदर्शनजी जवळजवळ तासभर दीक्षाभूमीवर होते. त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण केली. एका महामानवाला अभिवादन केले. स्मारक समितीनेही सुदर्शनजींचे स्वागत केले होते. त्यावेळच्या चर्चेत बौद्धधर्माबद्दल इतके अचूक ज्ञान, माहिती सुदर्शनजींकडून त्यांना मिळत होती की, ती मंडळीदेखील आश्‍चर्यचकित झाली होती. सुदर्शनजी ही भेट आटोपून कार्यालयात परतले आणि नागपूरच्या सामाजिक जीवनात विलक्षण उलथापालथ सुरू झाली. अनेकांना सुदर्शनजींनी दीक्षाभूमीवर जावे हे मान्य नव्हते. नागपुरातील दहा-बारा जणांनी दीक्षाभूमीवर जाऊन हा पुतळा धुवून काढला होता. यात एकही दलित बांधव नव्हता. बव्हंशी समाजवादी विचारवंत होते. त्यांच्या या कृत्यालाही प्रसिद्धी मिळाली, पण सुदर्शनजी फक्त स्मित करीत होते. ‘‘अरे, ते मला भेटले असते तर मी त्यांना माझी भूमिका सांगितली असती,’’ हेच त्यांचे शब्द होते. त्यानंतर या कृत्यामागे जे प्रमुख विचारवंत होते, त्यांच्या विचाराची कीव करण्यासाठी आम्ही तरुण भारतमधून त्यांच्यावर अघोषित बहिष्कार घातला. हे बहिष्कार घालणेही सुदर्शनजींना अमान्य होते. काही वर्षांनी त्या विचारवंताला महाराष्ट्रातील मोठा पुरस्कार मिळाला अन् तरुण भारतने वृत्त छापले नाही, तर पहिला फोन सुदर्शनजींचा आला होता, ते वृत्त तरुण भारतमध्ये का नाही म्हणून. शेवटी त्या विचारवंताच्या निधनानंतर हा बहिष्कार भाग आम्ही थांबविला होता व त्यावर अग्रलेखही लिहिला होता.
फक्त दीक्षाभूमीवर जाऊनच सुदर्शनजी थांबले नव्हते, तर पुढे त्यांच्याच काळात ख्रिश्‍चन व मुस्लिमबंधूही संघकार्यालयात, महालावरील डॉ. हेडगेवार भवनात आले होते. या दोन्ही धर्मांचा सुदर्शनजींचा मोठाच अभ्यास होता. ख्रिश्‍चनांचे एखादे शिष्टमंडळ संघकार्यालयात येण्याचा तो पहिला प्रसंग होता. त्याच वेळी सुदर्शनजींनी ‘भारतीय चर्च’ ही संकल्पना मांडली होती.
मुसलमान बांधवांना तर ते नेहमीच सांगत असत, ‘‘तुम्ही कोण वेगळे आहात, तुम्ही-आम्ही याच मातीचे. याच मातेचे पुत्र आहोत. तुमची श्रद्धा व्यक्त करण्याची पद्धती वेगळी आहे. तुम्ही मूर्तिपूजा मानीत नाही, पण अल्ला मानता ना? आपण वेगळे मुळीच नाही.’’ मुस्लिम बांधवांचे हे प्रतिनिधिमंडळ कार्यालयात असताना, चर्चा सुरू असताना अचानक त्यांच्यात चुळबूळ सुरू झाली. सुदर्शनजींनी पृच्छा केली- ‘‘काय झाले?’’ उत्तर आले- ‘‘आमच्या नमाजाची वेळ झाली आहे.’’ सुदर्शनजी म्हणाले, ‘‘मग काय अडचण आहे? आपण चर्चा थांबवू. तुम्ही इथेच नमाज पढा आणि पुन्हा चर्चा करू.’’ अन् त्या दिवशी संघाच्या मुख्यालयात वजू झाली, नमाज अदा झाला! हा एक वेगळाच इतिहास होता. संघ हा मुस्लिमविरोधी आहे मानणार्‍यांना ती एक चपराक होती. फक्त त्यात, चपराक हाणतो आहे, हा आविर्भाव नव्हता.
सुदर्शनजींमध्ये लहान बालकांतील निरागसता होती. एखादी गोष्ट, कल्पना स्फुरली की, त्यांचे निळे डोळे मंदपणे चमकत असत. या निरागसतेमुळेही अनेकदा ते वादळाचा केंद्रबिंदूही ठरत. पण अगदी खरं सांगायचं, तर वाद अंगावर घ्यायला त्यांना मनापासून आवडत असे. रामजन्मभूमी आंदोलन काळात बाबरी ढांचा पडला त्या वेळी सुदर्शनजी अयोध्येत रामललाच्या मूर्तीच्या प्रांगणातच होते. प्रभू राम हा त्यांच्या श्रद्धेचा विषय होता. बाबरी ढांचा हा बॉम्ब लावून उडविण्यात आला, असे एक विधान त्यांनी केले होते. त्यासाठी त्यांनी संदर्भ दिला होता, तो सर्वोदयी नेत्या निर्मलाताई देशपांडे यांचा. त्यांच्या या विधानावरून चांगलाच वाद उत्पन्न झाला होता. त्यातूनच पुढे सुदर्शनजींना न्या. लिबरहान आयोगापुढे साक्ष द्यायलाही जावे लागले होते. सरसंघचालकांनी अशाप्रकारे आयोगापुढे साक्ष द्यायला जाऊ नये, असे मानणारा एक मोठा वर्ग संघपरिवारात होता. पण, सुदर्शनजी मात्र आयोगापुढे साक्ष द्यायला ठाम होते- ‘‘त्यात काय आहे? आयोग त्याला सोपविलेले काम करीत आहे. त्या वेळी त्याला सहयोग द्यायलाच पाहिजे.’’ सरसंघचालक या अतिशय मोठ्या पदावर असतानाही सामान्य माणूस म्हणून चिंतन करायला त्यांना नेहमीच आवडत असे. त्यांच्यातील निरागसतेमुळे हे त्यांना जमत असे. आपल्या मागेपुढे कमांडोज राहणे वा आपण जनतेपासून वेगळे एका सुरक्षित आवरणात राहणे, हे त्यांना कधीच आवडले नाही. अगदी संघकार्यालयासमोर सुरक्षेसाठी भिंत घालण्याचा प्रस्ताव आला तेव्हाही त्यांचा विरोध होता. हे त्यांना मान्य नव्हते. पदामुळे काही निर्बंध तुम्हाला सहन करावेच लागतील, हे जेव्हा त्यांना ठामपणाने सांगण्यात आले, तेव्हाच त्यांनी या निर्बंधांना मान्यता दिली.
त्यांच्या सुरक्षापथकात असणारा माझा एक मित्र सांगत असे, ‘‘आम्ही तर या महापुरुषासोबत राहून धन्य होतो. क्वचित एखाद नेता बघायला मिळतो, जो आपल्या स्टाफच्या जेवणाखाण्याची, चहापाण्याची काळजी घेत असतो. सुदर्शनजी आम्हा सर्वांची काळजी करायचे. जेवण झाले की नाही, हेही विचारायचे. आम्हा सर्वांना ते नावाने ओळखत असत. फक्त काही निर्बंध त्यांच्या हालचालीवर, सुरक्षेच्या दृष्टीने घातले तर ते नाराज व्हायचे. घरातील आजोबांनी रुसून बसावे तसे रुसतही असत. काही वेळाने त्यांना आमची अडचण समजत असे आणि ते सहकार्य करत.’’
एक सहजता सुदर्शनजींच्या वागण्यात होती, पण जरूर तेव्हा ठामपणाही त्यांच्या ठायी होता. रा. स्व. संघाच्या एका समारंभात ओटीसी समाप्तीला निवृत्त एअर चीफ मार्शल ए. वाय. टिपणीस प्रमुख अतिथी म्हणून आले होते. पाकिस्तानचे सर्वेसर्वा जनरल मुशर्रफ भारत दौर्‍यावर आले होते, तेव्हा त्यांना सॅल्युट न करणारे जिगरबाज वायुसेनाप्रमुख म्हणून त्यांच्याबद्दल तरुणवर्गात खूप आदराची भावना होती. त्यांच्यामागे मोठे वलय होते. त्यांनी बोलताना काही प्रतिपादन केले होते, ते संघतत्त्वज्ञानाला मान्य होणारे नव्हते. सर्वांसमोर प्रश्‍न होता की, याचा प्रतिवाद करायचा का? असा प्रतिवाद करणे त्यांचा अपमान करणे तर ठरणार नाही ना? पण प्रतिवाद केला नाही, तर संघ ते विचार मानतो, असे होणार होते.
सुदर्शनजी समारोपाच्या भाषाला उभे झालेत. त्यांनी सुरवातीला एअर चीफ मार्शल टिपणीस यांचे भरपूर कौतुक केले. त्यांच्या राष्ट्रभक्तीला अभिवादन केले आणि नंतर ठामपणाने त्यांचे प्रतिपादन खोडून काढणे सुरू केले. या प्रतिपादनातील शब्द सौम्य होते. त्यात कुठेही अपमान होईल, असा शब्दप्रयोग नव्हता, पण विचारांतील स्पष्टता जागोजागी जाणवत होती. त्या क्षणाला त्या रेशीमबाग मैदानावरील सर्वांना जाणवून गेले की, एक सरसंघचालक संघतत्त्वज्ञान जीवनशैली उलगडून दाखवीत आहेत. एका सच्च्या राष्ट्रभक्ताला संघ समजावून सांगत आहेत. संपूर्ण भाषण संपले, पण कुठेही कटुतेचा लवलेश त्यांच्या भाषणातून झाला नाही. हा अनुभव एअर चीफ मार्शल टिपणीस यांनाही नवीन होता. निरागसतेचा एक वेगळा पैलू त्या वेळी बघता आला.
सुदर्शनजी नागपूरला असलेत की, तभा नियमितपणे वाचत असत. त्यातील एखादे प्रतिपादन आवडले नाही, काही चूक असेल, तर लागलीच शेजारी ठेवलेला फोन फिरवीत असत. त्या क्षणी ती चूक दाखविल्याविना त्यांना चैन पडत नसे. पण, ही चूक दाखविताना त्यांच्याशी जे बोलणे होई, त्यातून त्यांचे चिंतन, अभ्यास, विषयातील सखोल जाण स्पष्टपणाने दृग्गोचर होत असे, दिसून येत असे. जीवनातील सहजता एवढी होती की, कुणाला सांगून फोन करणे वगैरे भाग राहतच नसे. संघकार्यालयातून बोलतो आहे, वगैरे उल्लेख अनेक जण फोनवर करीत असत, पण सुदर्शनजींचा त्यावर विश्‍वास नव्हता.
एकदा रात्री ११ वाजताची घटना होती. पेजेस गेल्यामुळे संपादक विभाग काहीसा सुस्तावला होता. फोन वाजला. त्या वेळी बिसन मानकर नावाचे एक शिपाई आत होते. ते फोनजवळ होते. त्यांनी फोन उचलला. फोनमधून शब्द आलेत- ‘‘मी सुदर्शन बोलतो आहे. सुधीर आहे?’’ फोन खाली ठेवून बिसन ओरडत निघाला- ‘‘पाठकसाहेब, कुणी सुदर्शन बोलतो आहे.’’ लागलीच धावत येऊन मी फोन घेतला. तो फोन सुदर्शनजींचा होता. त्यांचे बोलणे संपल्यावर फोन खाली ठेवला. बिसनला जवळ बोलावले. म्हटले, ‘‘असे ओरडत सांगू नये. माऊथपीसवर हात ठेवून बोलावे. ते रा. स्व. संघाचे सरसंघचालक सुदर्शनजी बोलत होते.’’ तो तर फक्त पाया पडायचाच बाकी राहिला होता. संपूर्ण तरुण भारतभर तो सांगत फिरत होता की, ‘‘मी सुदर्शनजी साहेबांचा फोन घेतला होता. त्यांनी मला सांगितले. मी सुदर्शन बोलतो. मी तसेच साहेबांना सांगितले. पण तो सुदर्शनजींचा फोन होता.’’ बिसन मानकरचे संपूर्ण जीवन त्या फोनने धन्य होऊन गेले होते. त्याला जमिनीवर यायला चार-दोन दिवस लागले होते.
कार्यालयातून फोन करताना त्यांनी स्वतः फोन न करता स्वीय सहायकाला फोन लावायला सांगावे वगैरे अधिकारीवर्गाने सांगावे, असा प्रयास केला, पण त्यांना ते शेवटपावेतो मान्य झाले नाही. तरुण भारतात फोन करायला कशाला हवी आहे औपचारिकता, यावर ते ठाम होते. त्यांनी आपली शैली कधीच बदलली नाही.
१९९७-९८ चा सुमार असेल. दै. तरुण भारतात परिवर्तनाचे वारे सुरू झाले. तत्कालीन संपादक श्री. लक्ष्मणराव जोशी वर्षभराने निवृत्त होणार होते. नवीन संपादक येणार होते. एके दिवशी नरकेसरी प्रकाशनाचे अध्यक्ष प्राचार्य विनायकराव फाटक घरी आलेत आणि म्हणाले, ‘‘दिल्लीला दै. जागरणमध्ये प्रशिक्षणासाठी जाता येईल काय? महिना-दीड महिना कितीही काळ थांबावे लागेल.’’ राहण्याची व्यवस्था काय वगैरेही विचारणा झाली. तशी कल्पना नव्हती म्हणून झंडेवालात राहण्याची व्यवस्था झाली. झंडेवालामध्ये सुदर्शनजींची भेट झाली. तेच दै. जागरणच्या संपादकांना पत्र देणार होते. ते पत्र घेतले आणि दै. जागरणला रोज जाणे सुरू झाले. कधी आय.एन.एस. भवनातील कार्यालयात, तर कधी नोएडात जावे लागत असे. या कालावधीत अधूनमधून सुदर्शनजींची भेट होत होती आणि काय प्रगती आहे, याबाबत ते विचारणा करीत असत. दीड महिन्याने सुदर्शनजींशी सविस्तर भेट ठरली. त्यानंतर मी नागपूरला परत जाणार होतो.
ती भेट खरोखर संस्मरणीय होती. एका अर्थानं ती मुलाखत होती, म्हटले तर संवाद होता. सुदर्शनजींसोबत तास-दीड तास बसण्याची ती पहिली वेळ होती, पण त्याचा कसलाही तणाव सुदर्शनजींनी माझ्यावर येऊ दिला नाही. त्या वेळी मला माहीत नव्हते, पण दै. जागरणच्या संपादकांकडून त्यांनीही माझ्या कामाची माहिती घेतली होती. भेट चांगली संस्मरणीय झाली. शेवटी मी त्यांना माझ्याकडून सांगितले, ‘‘मी शालेय व महाविद्यालयीन जीवनात अ. भा. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो. मध्यप्रदेश, विदर्भ व महाराष्ट्र प्रदेशात काम केले होते, पण या कालावधीत दैनंदिन शाखेत जाणे मात्र थांबले होते. मी तृतीय वर्ष काय, प्रथम वर्षही केले नव्हते.’’ माझे बोलणे संपल्यावर हसतहसत सुदर्शनजी विचारते झालेत- ‘‘अरे, तू किती वर्षं तरुण भारतात आहेस?’’ मला पंचवीस वर्षे झाली होती. मी तसे सांगितले. ते म्हणाले, ‘‘इतके वर्षं तरुण भारतात राहणे हे तृतीय वर्ष होण्यासारखेच आहे.’’ पुढे एकदा तरुण भारतच्या दिवाळी अंकासाठी सुदर्शनजींची मुलाखत मी घेत होतो तेव्हा असाच एक प्रश्‍न त्यांना विचारला होता, ‘‘स्वयंसेवक हा भाजपाचा असणे, परिषदेचा असणे, विहिंपचा असणे हे पर्याय असू शकतात काय?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुझा अनुभव काय म्हणतो? पण तुम्ही कुठेही असा, रोज संघस्थानावर एक तास जा. मनावरील मळभ दूर होते. कशासाठी आपण कार्यरत आहोत, याचे भान येते. जाणिवा प्रगल्भ होतात.’’
प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती पदावर आरूढ झाल्यात. त्यांना इंग्रजीत तर ‘राष्ट्रपती मॅडम’ संबोधता येत होते. पण, मराठीत काय? तरुण भारतात प्रसिद्ध झाले, ‘राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील’ अन् त्यावर आक्षेप घेणारा फोन रात्री नऊ-सव्वानऊ वाजता आला. तो सुदर्शनजींचा होता- ‘‘प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती पदावर आहेत, असे जरूर म्हणा, पण जेव्हा त्यांना त्या पदाने संबोधण्याची वेळ येईल, त्या वेळी त्यांना राष्ट्राध्यक्षा म्हणा.’’ हे त्यांचे आग्रही प्रतिपादन होते. राष्ट्राध्यक्ष हा शब्दप्रयोग आपण अध्यक्षीय शासनप्रणालीत करू, हे त्यांना मान्य नव्हते. आजपावेतो आपल्याकडे राष्ट्राध्यक्षपद नाही. त्यामुळे आपण कुणालाच राष्ट्राध्यक्ष संबोधत नाही. प्रजातांत्रिक लोकशाहीवादी भारतात पद राष्ट्रपतींचं आहे हे सर्वांना ज्ञात आहे. त्यांना इंग्रजीतही अध्यक्ष संबोधिले जात नाही. त्यामुळे आपल्या राजकीय प्रणालीत अध्यक्षपद नाही. पण, राष्ट्रपती हे पद आहे व त्या पदावर स्त्री आहे म्हणून त्या पदावरील स्त्रीचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ करणे व्याकरणदृष्ट्या कदाचित बरोबर राहील, पण व्यवहारात ‘पत्नी’ या शब्दाचा अर्थ वेगळा आहे म्हणून तो शब्दप्रयोग वापरता येणार नाही. आपण मराठीत राष्ट्राध्यक्षा हाच शब्दप्रयोग रूढ करायला हवा. त्यातून अध्यक्षीय प्रणाली ध्वनित होणार नाही.
त्यांच्या या प्रतिपादनावर आमच्या संपादक विभागात चर्चा झाली. अनेकांना असे वाटत होते की, पंतप्रधान हा शब्दप्रयोग आपण जसा वापरतो तसे राष्ट्रपती प्रतिभाताईंना संबोधिले जावे. हा पर्याय मान्य नसणार्‍या काही सहकार्‍यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. आपल्या शैलीपुस्तिकेप्रमाणे आपण ‘राष्ट्राध्यक्षा’ हा शब्द प्रयोग वापरू, असा निर्णय संपादक म्हणून मी घेतला आणि प्रतिभाताई राष्ट्रपती पदावरून निवृत्त होईस्तोवर आम्ही कसोशीने वापरला. कुणीतरी प्रयोग करावा लागतो, आघाडी घ्यावी लागते, त्यामागे प्रेरणास्थान सुदर्शनजी होते.
साधारणत: दै. तरुण भारताला रा. स्व. संघाचे मुखपत्र मानण्याची फॅशन आहे. जेव्हा की माझा स्वतःचा जवळजवळ चार दशकांचा अनुभव आहे की, संघकार्यालयातून कधीही संपादकांना सूचना येत नाहीत की, अमुक विषयावर तुम्ही लिहा, असे मुद्दे घ्या, तमुक विषयावर लिहू नका. एखाद्या प्रश्‍नावर संपादकाचे जे स्वतःचे आकलन असते त्याप्रमाणे तो लिहितो. ते आकलन संघाचे मत आहे, असे समजून त्यावर टीकाटिप्पणी होत राहते. भाजपा-एनडीए सत्तेवर होते तेव्हा संघ- भाजपात-एनडीएत प्रत्येक विषयात एकमत नव्हते, एकवाक्यता नव्हती. रा. स्व. संघाच्या प्रतिनिधिसभेने त्या वेळी आयोडीनयुक्त मिठाची सक्ती अन् विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक या विषयावर नापसंती व्यक्त करणारे ठराव केले होते व त्या भूमिकेची अंमलबजावणी न केल्याबद्दल रालोआ सरकारवर टीका केली होती. सहसरकार्यवाह म्हणून सुदर्शनजींनी त्या पत्रपरिषदेला संबोधित केले होते व लागलीच प्रमोद महाजन यांनी नागपूरला येऊन पक्षाची भूमिका मांडली होती. हा सगळा प्रसंग गंभीर, आगळावेगळा होता. तो विषय मी सोडला असता तरी हरकत कुणीही घेतली नसती, पण मी तो विषय अग्रलेखासाठी घेतला. त्या संपूर्ण प्रश्‍नाबाबत माझे जे आकलन होते त्यानुसार अग्रलेख लिहिला. ते आकलन नक्कीच प्रतिनिधिसभेच्या आकलनापेक्षा भिन्न होते. दुसर्‍या दिवशी सकाळी खूप गोंधळ होईल, वगैरे माझी अपेक्षा होती. पण, सकाळी सकाळी सुदर्शनजींचाच फोन होता- कौतुक करणारा. वेगळा विचारबिंदू त्या अग्रलेखात आहे, याबाबत.
त्या अग्रलेखात मी पाञ्चजन्यच्या दिल्लीतील कार्यक्रमाचा उल्लेख केला होता. पंतप्रधान अटलजींना त्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलविले होते व सरसंघचालक श्री. रज्जूभय्या अध्यक्षस्थानी राहणार होते. तुघलकचे संपादक चो रामास्वामी यांना सन्मानित करण्याचा तो सोहळा होता. पंतप्रधानपद व त्यांची सुरक्षाव्यवस्था याची माहिती आयोजकांना नव्हती. सहा वाजताचा कार्यक्रम व बरोबर सहा वाजता अटलजी आपल्या निवासस्थानाहून निघाले आणि कार्यक्रमस्थळी जाणारे सर्व रस्ते सुरक्षापथकाने बंद केलेत. त्यात पूजनीय सरसंघचालकांना घेऊन येणारी कार अडकली होती. अटलजी कार्यक्रमस्थळी आलेत अन् सरळ व्यासपीठावर गेले. रज्जूभय्यांची गाडी सोडा, असे संदेश गेलेत, पण तब्बल चाळीस मिनिटांनी सरसंघचालक व आयोजन समितीचे प्रमुख कार्यक्रमस्थळी पोहोचले. तोवर अटलजी एकटे व्यासपीठावर होते. समोर चो रामास्वामी, लालजी वगैरे बसले होते. हे उदाहरण नमूद करून मी लिहिले होते की, पंतप्रधान कार्यालय कसे चालते, त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेआड स्वतः पंतप्रधानही येऊ शकत नाही, हे आयोजकांना उमगले नाही म्हणून सरसंघचालक कार्यक्रमस्थळी उशिराने आलेत व नंतर उशिराने कार्यक्रम सुरू झाला. आमच्या लेखी कुणी कितीही महत्त्वाचा असला, वंदनीय असला तरी सुरक्षापथकाच्या दृष्टीने पंतप्रधान आणि फक्त पंतप्रधानच महत्त्वाचे राहतात. आयोजकांनी सरसंघचालकांना पंतप्रधान घरून निघण्याआधीच कार्यक्रमस्थळी आणले असते, तर अटलजी चाळीस मिनिटे फक्त श्रोत्यांकडे बघत व्यासपीठावर उपस्थित आहेत, असा प्रसंग घडला नसता.
सरकार म्हणून सरकारचे आकलन, सरकारला असणारी माहिती व बाकी इतर सर्वांना असणारी माहिती भिन्न राहते. त्यामुळे भाजपा व संघाच्या प्रतिनिधिसभेच्या आकलनात भिन्नता आहे, असे मी नमूद केले होते.
तसाच नाजूक प्रसंग भामसंचे दत्तोपंत ठेंगडी अन् अटलजी यांच्या संदर्भात नागपूरला उद्भवला होता. पंतांनी अटलजींना ‘गिनिपिग’ संबोधिले होते. त्यावरही माझा अग्रलेख वादळी ठरला होता. त्याच्याही भूमिकेबाबत सुदर्शनजींची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडली होती.
चालताबोलता ज्ञानकोश असणार्‍या सुदर्शनजींबरोबर संवाद साधणे हा विलक्षण आनंदाचा भाग राहत असे. आपल्याला त्यातून भरपूर ज्ञानाचा साठा मिळत असे. आसाम प्रश्‍न असो, की पंजाबचा विषय असो, इतरांना असते त्यापेक्षा वेगळी माहिती सुदर्शनजींजवळ राहत असे.
स्वदेशीबाबत ते फार आग्रही राहत असत. संघाचे एक ज्येष्ठ अधिकारी परदेश दौर्‍यावर गेले होते. त्या ठिकाणी त्यांना ५० शिट्‌ट्यांचा संच भेट म्हणून मिळाला होता. नागपूरला आल्यावर त्यांनी त्या शिट्‌ट्या विभिन्न कार्यकर्ते, स्वयंसेवक, अधिकारी यांना देण्याचे ठरविले. पण, त्या शिट्‌ट्या विदेशी. संघात चालतील काय, हा प्रश्‍न होता. त्यांनी सुदर्शनजींना विचारले. सुदर्शनजींनी लागलीच होकार भरला, पण होकार भरताना सांगितले, ‘‘या शिट्‌ट्या त्या देशातील पैशातून निर्माण झाल्या आहेत. तो पैसा आपला नाही. त्यामुळे या शिट्‌ट्या भेट देणार्‍यांसाठी देशीच होत्या. त्या आपण वापरायला हरकत नाही.’’
वैचारिक स्पष्टता असली तरी इतरांचे विचारस्वातंत्र्य, चिंतनस्वातंत्र्य त्यांना मान्य होते. वैचारिक मतभेद असले तरी त्यांच्याशी मैत्री करायला सुदर्शनजींना आवडत असे. साम्यवादी नेता श्रीपाद अमृत डांगे यांची कन्या- माजी खासदार रोझा देशपांडे व त्यांचे पती बानी देशपांडे हे सुदर्शनजींच्या अभिन्न मित्रांपैकी होते. मुंबईत गेल्यावर त्यांच्याशी गप्पा मारल्याविना सुदर्शनजी मुंबई सोडत नसत.
नागपूरलाही ख्यातनाम साहित्यिक प्राचार्य राम शेवाळकर त्यांचे खास मित्र होते. ‘पाणियावर मकरी’ हे आपले आत्मचरित्र सुदर्शनजींना द्यायची रामभाऊंची इच्छा होती. त्यांनी ‘कधी भेटायला येऊ’ वगैरे म्हणून संपर्क साधला. दुसर्‍या दिवशी नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात कुठला तरी कार्यक्रम होता. कार्यक्रम आटोपल्यावर सुदर्शनजी थेट रामभाऊंच्या घरी पोहोचले. सुदर्शनजींचे आगतस्वागत झाले. प्यायच्या पाण्याचे ग्लास घेऊन रामभाऊंच्या सुनबाई समोर आल्यात. सर्व ग्लासेस पाण्याने भरलेले होते. सुदर्शनजी हसत हसत म्हणाले, ‘‘सर्वांना पूर्ण ग्लासभर पाणी प्यावे एवढी तहान नसते. आपण अर्धा ग्लास द्यावा. ज्याला अजून लागेल तो मागून घेईल. पण बाकीच्या ग्लासमधील पाणी वाया जात नाही.’’ अशा लहानलहान बाबींबाबत सुदर्शनजी फार आग्रही होते.
ते संघाचे बौद्धिकप्रमुख होते तसेच शारीरिकप्रमुखही होते. नियुद्धातील ते आक्रमक खेळाडू होते. ही दोन्ही पदे भूषविणारे ते संघातील एकमेव अधिकारी होते. या दोन्ही क्षेत्रांत त्यांची तज्ज्ञता वादातीत होती.
२१ मार्च २००९ याच रेशीमबागेत उगवला होता. संघाचे सरकार्यवाह असणारे डॉ. मोहनजी भागवत यांनी सरकार्यवाह पदाचे दायित्व सोडले होते. सुदर्शनजींनी त्यांना जवळ बसवून घेतले आणि आपले उद्बोधन सुरू केले. ‘‘माझी प्रकृती आता पूर्वीसारखी दायित्व उचलण्यासाठी चांगली राहत नाही. विस्मरणाचा एक भाग आता जीवनात आला आहे. तासभर एखाद्या व्यक्तीशी गप्पा मारल्यावरही ती व्यक्ती आठवते, पण नाव आठवत नाही. कोण भेटले होते हे समोरच्याला काय सांगावे, असा प्रश्‍न पडतो. ही स्थिती सरसंघचालकाला चांगली नाही म्हणून मी हे पद सोडत आहे व ही जबाबदारी डॉ. मोहन भागवतांवर सोपवत आहे.’’
जितक्या सहजतेने जबाबदारी स्वीकारली होती, तेवढ्याच सहजतेने त्यातून सुदर्शनजी मुक्तही झाले होते. त्यानंतर चार-दोन दिवसांनी महालातील संघ मुख्यालयात जाण्याची वेळ आली. संध्याकाळची मोहिते शाखा लागली होती अन् चार-दोन दिवसांपूर्वीपावेतो सरसंघचालक असणारे सुदर्शनजी बालगण घेत होते. त्यांचे गणशिक्षक झाले होते. एवढी सहजता, साधेपणा संघाशिवाय अन्य संघटनेत बघणेही शक्य नाही. फार कशाला, मार्च १२ मध्ये झालेल्या प्रतिनिधिसभेत सुदर्शनजी सर्व प्रतिनिधींबरोबर खाली सतरंजीवर बसले होते व सांगत होते, ‘‘माजी सरसंघचालक. पण स्वयंसेवक तर आयुष्यभर राहणार आहे. तेव्हा इथे बसणं हे कर्तव्य आहे.’’
एका अर्थाने बघितले, तर सुदर्शनजी आगळेवेगळे होते. प्रत्येकाच्या मनात ते स्वत:चे स्थान कधी निर्माण करून जात ते समजतही नव्हते. म्हणूनच सुदर्शनजींच्या निधनाचे वृत्त येताच फक्त संघस्वयंसेवक आणि भाजपाचेच नेते त्यांच्या अंत्यदर्शनाला आले होते असे नाही, तर विविध पक्षांतील आणि विविध धर्मांतील लोकही त्या ठिकाणी आले होते. त्यात मुसलमान होते, ख्रिश्‍चन होते, बौद्धधर्मीय होते आणि विविध राजकीय छटांचे प्रतिनिधित्वही त्यांत होते. असे सुदर्शनजी प्रत्येकाच्या मनात स्वत:चे चिरंतन स्थान निर्माण करून राहतील, यात शंका नाही. जे जीवनकार्य सुदर्शनजींनी स्वीकारले होते, ते पूर्णत्वाला नेणे हीच पुरुषोत्तम मासाच्या अखेरच्या दिवशी दिवंगत झालेल्या रा. स्व. संघाच्या पाचव्या सरसंघचालकांना खरी श्रद्धांजली ठरेल.
•दिलीप धारूरकर
केंद्रात आणि अनेक राज्यात हिंदुत्त्वाचा विचार मानणारा राजकीय पक्ष सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झालेला असताना आणि हिंदुत्त्वाचा विचार देशातील वैचारिक चर्चेत केंद्रस्थानी असताना ते सरसंघचालक झाले होते. अशा काळात संघटनेला जी दिशा दिली पाहिजे त्यासाठी त्यांनी सतत चिंतन आणि मार्गदर्शन केले. सत्ता हे अंतिम साध्य नसून समाजपरिवर्तन आणि देशाला परमवैभवाप्रत घेऊन जाणे हे अंतिम साध्य आहे याची जाणीव सतत सर्वांना राहील याबाबत ते सतर्क होते. वैचारिक संघर्ष हा आता महत्त्वाचा आहे असे सांगून  वैचारिक संघर्षासाठी सर्वांनी तयार असले पाहिजे असे ते सांगत असत. प्रसारमाध्यमांच्या भूमिकेची समीक्षा त्यांच्या बोलण्यातून अत्यंत प्रखरपणे आणि देशहिताचा संदर्भ देऊन सतत घडत असे. गुजरातमधील दंगलीत एका ठिकाणी आग लागली तर दिवसभर तोच तो धूर दाखवत टीव्ही वाहिन्यांनी भयावह चित्र कसे उभे केले, भारतीयत्वाचा विचार देणारे प्रसंग, घटना यांना माध्यमांनी कसे महत्त्व दिले पाहिजे हे सांगताना ते अतिशय आग्रही होत असत. 
जीवनासाठी उच्च ध्येय आणि उच्च ध्येयासाठी संपूर्ण जीवनाचे समर्पण हे कसे असते ते जगून दाखविणारे अधुनिक युगातील कर्तव्यकठोर तपस्वी म्हणजे कुपहळ्ळी सीतारामय्या सुदर्शनजी! वयाच्या नवव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेचे स्वयंसेवक झाल्यानंतर हळूहळू ध्येय साकारत गेले. हा देश परमवैभवाला घेऊन जाण्याचे संघाचे ध्येय हेच आपल्या जीवनाचे ध्येय मानून त्यासाठी सर्वस्व समर्पणाचा संकल्प त्यांनी केला. १९५४ साली वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी संघासाठी सर्वस्व समर्पणाचा विचार करून संघाचा पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम सुरू केले. वास्तविक त्या काळात टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या तरुणांना चांगले करिअर करण्याची संधी होती. आपले भवितव्य आणि देशाचे भवितव्य हे वेगळे असूच शकत नाही असे मानून आपल्या करिअरपेक्षा राष्ट्रीय चारित्र्यनिर्मितीला प्राधान्य देण्याची आणि त्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याची उत्कटता त्यांच्याकडे होती. राष्ट्रकार्याला प्राधान्य देऊन तेच जीवनाचे ध्येय ठरलेले असल्याने त्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याचा निग्रह त्यांनी केला. मग जिल्हा प्रचारक, विभाग प्रचारक अशा जबाबदार्‍या पार पाडत दहा वर्षांत ते प्रान्तप्रचारक या पदापर्यंत पोहोचले. नंतर पूर्वांचलातही क्षेत्र प्रचारक म्हणून त्यांना जबाबदारी दिली गेली. हा सगळा सुदर्शनजींचा जीवनपट सर्वांना माहिती आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता, स्वतःची विश्‍लेषणात्मक दृष्टी, प्रचंड वाचन, जबरदस्त स्मरणशक्ती, अमोघ वक्तृत्त्व अशा अनेक गुणांचा समुच्चय त्यांच्या  व्यक्तिमत्त्वात होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शारीरिक विभाग आणि बौद्धिक विभाग असे दोन विभाग शाखेच्या कार्यक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी यासाठी काम करत असतात. या दोन्ही विभागात गती असणारे स्वयंसेवक फारच दुर्मिळ असतात. सुदर्शनजी हे अशा दुर्मिळ स्वयंसेवकांपैकी होते. शारीरिक कार्यक्रमातील सर्व विषयात ते पारंगत होते आणि बौद्धिक विषयातही त्यांची मोठी तयारी आणि व्यासंग होता. त्यामुळे संघाच्या इतिहासात अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख आणि अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख अशा दोन्ही पदांवर राहिलेले आणि सक्षमपणे दोन्ही जबाबदार्‍या पार पाडणारे ते एकमेव कार्यकर्ते होते. त्यानंतर सहसरकार्यवाह झाले आणि रज्जूभैय्या यांनी आपल्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्यानंतर सरसंघचालकपदाची जबाबदारी सुदर्शनजी यांच्याकडे सोपविली.
सुदर्शनजी यांचे व्यक्तिमत्त्व एखाद्या तपस्वीसारखे होते. त्यांच्या असंख्य आठवणी आज मनात दाटल्या आहेत. ते जेव्हा अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख होते तेव्हा मी एका जिल्ह्याचा बौद्धिक प्रमुख होतो. जिल्हा बौद्धिक प्रमुखांची मुंबईत बैठक होती. संघात बौद्धिक कार्यक्रम म्हणजे शाखेतील पद्य, बोधकथा, सुविचार, सुभाषित, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे बौद्धिक वर्ग इतकेच असे आमचा समज होता.  या बैठकीत सुदर्शनजी यांचे सत्र झाले. त्यांनी संघाच्या शाखेत स्वयंसेवकांची संख्या कशी वाढेल हे सांगताना आठवी, नववी, दहावी या वर्गातील वयोगट असलेल्या मुलांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि या वयोगटातील स्वयंसेवकांसाठी त्यांना आकर्षित करतील, त्यांच्या भावविश्‍वाला आवाहन करतील असे कार्यक्रम आयोजित करावेत असे सांगितले. या प्रकारचे कार्यक्रम कसे असावेत याची दहापेक्षा अधिक उदाहरणे अगदी बंदुकीतून गोळ्या सुटाव्यात तशा गतीने त्यांनी सांगितली. अखंड भारताचा नकाशा मैदानावर आखावा, एकेका स्वयंसेवकाने भारताच्या इतिहासातील वैभवशाली कार्य करणार्‍या एकेका महापुरुषाच्या  ठिकाणावर उभे राहून हातात मशाल घेऊन जावे. त्या महापुरुषाची थोडक्यात माहिती द्यावी, असे करत करत एकेका प्रान्तातील एक-दोन महापुरुषांची माहिती देत संपूर्ण देशाचा नकाशा भरून जावा. नंतर सर्वांनी भारताच्या नकाशाच्या सीमेवर उभे राहून भारत मातेचा जयजयकार करावा. असे कितीतरी उपक्रम त्यांनी सुचविले. आम्ही थक्क झालो. याच बैठकीत थक्क होण्याची वेळ पुन्हा लगेच आली. दोन सत्रांच्या मधल्या वेळेत कोणाला तरी शोधत मी चाललो होतो. स्नानगृहातून कपडे धुण्याचा आवाज आला. सहज डोकावले तर तेथे सुदर्शनजी आपले कपडे धुण्यात मग्न झालेले होते. संघातील शब्देविण संवादे ही व्यक्तिमत्त्व विकासाची जी प्रक्रिया असते तिचे असे अनुभव मनावर कोरले जात असतात. सुदर्शनजी सहसरकार्यवाह असताना मी काही कामानिमित्त दिल्लीला गेलो होतो. झंडेवाला कार्यालयात गेलो. अटलजी सरकारने केलेल्या पोखरणच्या अणुचाचणीबाबत मी दिवाळी अंकासाठी मुलाखती घेण्यासाठी तेथे गेलो होतो. सुदर्शनजी यांची भेट घेतली. ते म्हणाले, उद्या जेएनयूमध्ये याच विषयावर माझे आणि डॉ. मुरलीमनोहर जोशी यांचे भाषण आहे. तिथे चल. आमची भाषणे टेप करून घे. मध्ये मध्ये तुझे प्रश्‍न टाक म्हणजे झाली मुलाखत. तुझ्या काही प्रश्‍नांची उत्तरे भाषणातून मिळाली नाही तर नंतर चहापान आहे तेव्हा तेवढेच विचारून घे. मी जेएनयूमध्ये येतो असे म्हणताच विनाविलंब ते म्हणाले तिकडे कशाला जातोस. इकडेच ये. येथून माझ्याबरोबरच चल. माझी म्हणजे आपल्या तरुण भारतच्या एका आवृत्तीच्या संपादकाची ते कशी काळजी करतात हे त्यातून डोकावत होते. त्यांची ही आत्मीयता मनाला
 उभारी देणारी होती. आमचे हे संभाषण चालू होते तेव्हा माझ्याशी बोलत बोलत त्यांनी आपला स्वतःचा गणवेश अतिशय काळजीपूर्वक बाहेर काढला. त्यातल्या पट्ट्याला पॉलिश केले. पदवेश म्हणजे काळे बूट बाहेर काढून त्यावर पॉलिश केले. मी कुतूहल म्हणून विचारले. सुदर्शनजी गणवेशाची तयारी कशाकरिता करत आहात? ते शांतपणे म्हणाले, अरे, या झंडेवालामध्ये एक शाखा लागते. तिचा आज गणवेश दिन आहे. मग गणवेश तयार करायला नको? संघात कितीही मोठ्या पदावर असलो तरी आपण ज्या शाखेत जातो तिथे स्वयंसेवकच असतो, त्यामुळे तिथल्या सगळ्या आज्ञा, नियम, कार्यक्रम यांचे अनुसरण एक स्वयंसेवक म्हणून काटेकोरपणे केले पाहिजे याचा हा  वस्तुपाठ कधीही विसरता येणार नाही असा होता.
सुदर्शनजी सरसंघचालक झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा मराठवाड्यात नांदेड येेथे खालसा पंथाच्या त्रिशताब्दीनिमित्त प्रवास होता. देवगिरी तरुण भारतसाठी त्यांची मी मुलाखत घ्यावी असे ठरले. मी नांदेडला पोहोचलो. तेथे विभाग कार्यवाह यांच्याशी बोलणे झाले. वारंगा फाटा येथे त्यांचे स्वागत होणार आहे. तेथे मी जावे आणि तेथून नांदेडपर्यंत त्यांच्या गाडीतच बसून यावे. येताना त्यांची मुलाखत गाडीतच पूर्ण करावी असे ठरले. मी टेपरेकॉर्डर वगैरे तयारी करून वारंगा फाटा येथे गेलो. स्वागत, परिचय, चहा पान झाले. सुदर्शनजी यांनी गाडीत बसताना मला पाहिले. चल बैस असे म्हणताच मी गाडीत बसलो. आता मुलाखत नक्की असे मला वाटले. मी त्यांना गाडीत बसताच त्याबाबत बोललो तेव्हा ते म्हणाले, हे बघ, माझा हा प्रवास शाखेच्या कामासाठी आहे. यात मुलाखत, पत्रकार परिषद काही नाही. तुला माहिती आहे ना? असे म्हणून ते पुढे लगेच म्हणाले -
वृत्तपत्र में नाम छपेगा, पहनेंगे  स्वागत समुहार
छोड चलो यह क्षूद्र भावना, हिंदू राष्ट्र के तारणहार॥
माझे बोलणेच खुंटले. अन्य खूप गप्पा झाल्या. तरुण भारतची त्यांनी बारकाईने चौकशी केली. मुलाखत अर्थातच झाली नाही.
संभाजीनगरमध्ये तीन दिवसांची बैठक होती. सुदर्शनजी मार्गदर्शन करणार होते. त्या दरम्यान तीन दिवसात केव्हातरी त्यांची वेळ घेऊन मी सविस्तर मुलाखत तरुण भारतच्या दिवाळी अंकासाठी घ्यायची असा प्रयत्न चालू होता. प्रान्त प्रचारकांनी मला सांगितले की तुम्हाला वेळ दिली आहे. त्यांचा निवास डॉ. तुपकरी यांच्या घरी आहे. आज रात्रीच्या जेवणानंतर मुलाखतीसाठी तेथे तुम्हाला सुदर्शनजी मुलाखत देतील. मी ठरलेल्या वेळेपेक्षा थोडे आधीच डॉ. तुपकरी यांच्या घरी पोहोचलो. सुदर्शनजी यांचे जेवण संपत आले होते. गप्पा मारत जेवण चालू होते. डॉ. अश्‍विनीकुमार, डॉ. जयंत तुपकरी , दोघांच्याही डॉक्टर पत्नी, तुपकरींच्या भगिनी डॉ. मधुश्री सावजी व मेव्हणे डॉ. संजीव सावजी असे सहा डॉक्टर्स तेथे जेवता जेवता गप्पांत सहभागी झालेले. मीही गप्पा ऐकण्यात सहभागी झालो. विषय चालला होता हृदयरोग! सुदर्शनजी त्यांच्या वाचण्यात देशी, विदेशी लेखकांच्या लेखनात हृदयरोगावरचे उपचार, वेगवेगळे घरगुती उपाय, अनुभव असे जे त्यांच्या वाचनात होते ते सुदर्शनजी सांगत होते. कुठे कोणाला तिखट खाल्ल्याने कसा फायदा झाला, कोठे भोपळ्याचा रस सेवन करून हृदयविकारावर कसा फायदा झाला असे वेगवेगळे विषय त्या सांगण्यात होते. जेवण संपून हात वाळून गेले तरी त्यांचे सांगणे चालूच होते आणि सर्व डॉक्टर्स आणि मी ऐकण्यात रंगून गेलो होतो. चौफेर वाचन, भारतीय उपचार पद्धती, भारतीय आयुर्वेद यातील उपायांबाबत विश्‍वास असे अनेक विषय त्यात डोकावत होते. जेवणापेक्षाही या श्रवणभक्तीने तृप्त करणारा तो अनुभव होता.
डेहराडून येथे देशभरातील हिंदुस्थान समाचारच्या प्रतिनिधींची दोन दिवस बैठक होती. सुदर्शनजी बैठकीत पूर्णवेळ उपस्थित होते. बातमी लेखनावर चर्चा चालू होती. शीर्षकामध्ये संक्षिप्त रूपे वापरून वाचकांना कोड्यात टाकू नये असे सांगत असताना माझ्याकडून उदाहरण म्हणून एक इंग्रजी शब्द उच्चारताच सुदर्शनजींनी लगेचच त्याचा हिंदी प्रतिशब्द सांगितला आणि शीर्षकात इंग्रजी शब्दही असता कामा नयेत असे तात्काळ सांगितले. इंडिया मानसिकता आणि भारत मानसिकता असे ते नेहमी आपल्या विवेचनात फरक सांगत. स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कृती याबाबत अत्यंत अग्रही भूमिका ते मांडत असत. गोपाल, भारतीय तंत्रज्ञान आणि भारतीय विज्ञान या संदर्भात त्यांचा गाढा अभ्यास होता. त्याबाबत ते अत्यंत आग्रहाने उदाहरणांसह विवेचन करत. बौद्धिकामध्ये कवितांच्या ओळी,  जोशपूर्ण समारोप अशी वैशिष्ट्ये असत. भलेही राजकीय पक्ष, भारतीय जनता पक्ष यांच्या चुकलेल्या भूमिकेविषयी ते कठोरपणे टीका करत, मात्र आपल्या भाषणात अटलजींच्या कवितेतील ओळींचा वापर करून आत्मीयतेचा एक धागा कसा आहे ते नकळत सांगून जात.
दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवनभर अविचल चलता है|
अशा एका संघगीताच्या ओळी आहेत. सुदर्शनजींचे जीवन या ओळींचे जणू प्रात्यक्षिकच होते. ते शेवटपर्यंत  दिव्य ध्येयाकडे अविचल राहून सतत त्यासाठी चालत राहिले. ज्या रायपूरमध्ये त्यांचा जन्म झाला त्याच रायपूरमध्ये नित्यनेमाप्रमाणे फिरायला जाऊन आल्यानंतर प्राणायाम करत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. रायपूर ते रायपूर असा हा ध्येयनिष्ठेचा अविचल प्रवास प्रत्येकाला हे राष्ट्र परमवैभवाला नेण्याच्या दिव्य ध्येयासाठी काम करण्याची प्रेरणा देणारा आहे. त्याच्या स्मृती जागवत हत्तीचे बळ अंगी घेऊन लाख संकटांना सामोरे जात लवकरात लवकर हे दिव्य ध्येय गाठण्यासाठी सर्वजण कृतीबद्ध होतील यात शंका नाही ! तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!
शुक्रवारी अचानक कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी राष्ट्रपती भवनात गेल्या आणि त्यांनी प्रथमच नव्या राष्ट्रपतींची ब भेट घेतली. त्याची कारणे कोणीही माध्यमांना कळू दिलेली नाहीत. पण त्यामागे मध्यावधी लोकसभा निवडणूकीची दाट शक्यता आहे. किंबहूना त्याच कारणासाठी सोनिया प्रणबदांना भेट्ल्या आहेत. त्या भेटीमागे त्यांच्यासह कॉग्रेसला भेडसावणार्‍या भितीचे नाव नरेंद्र मोदी असल्याचे एका जुन्या जाणकाराचे मत आहे. मोदी येत्या वर्ष अखेर होणार्‍या गुजरातच्या विधानसभा निवाणूका जिंकले तर त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखता येणार नाही आणि मोदींना आणखी एक वर्ष दिल्लीच्या निवडणूकांची तयारी करण्यास सवड दिली; तर त्यांना पंतप्रधान होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, अशा भितीने आता कॉग्रेस पक्षाला पछाडलेले आहे. त्याच बाबतीत प्रणबदांचे मत घ्यायला सोनियाजी राष्ट्रपती भवनात गेल्या होत्या, असा निष्कर्ष निघतो.

   मागल्या काही दिवसात लागोपाठ मतचाचण्यांचे निष्कर्ष येत आहेत आणि त्यात नरेंद्र मोदी यांना लोकांची मिळणारी पसंती कॉग्रेसची झोप उडवणारी ठरली आहे. दिल्लीतील एका ज्येष्ठ पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या वाहिन्यांनी घेतलेल्या या चाचण्या मुळातच कॉग्रेस पुरस्कृत असून त्यातून मध्यावधी निवडणुकीसाठीची ती चाचपणी आहे. पण त्या प्रत्येक चाचणीत मोदी यांनाच लोकांचा वाढता पाठींबा मिळत असल्याने कॉग्रेसची बेचैनी वाढली आहे. सर्व बाजूनी मतांची चाचपणी व्हावी, म्हणुन प्रत्येक चाचणीत विभिन्न विषयांचा आढावा घेण्यात आला आहे. अण्णा, रामदेव किंवा राहुल, अडवाणी, नितीशकुमार यांच्यासह तिसर्‍या आघाडीच्या पंतप्रधानाची कल्पना मांडूनही मोदींकडेच लोकमत झुकल्याचे प्रत्येक चाचणीने दाखवले आहे. त्यामुळेच मोदींनी दिल्लीकडे मोर्चा वळवण्यापुर्वी लोकसभा निवडणूका उरकणे कॉग्रेसला सुरक्षित वाटू लागले आहे. त्यामागे मोदींना गुजरातमध्येच रोखण्याचा डावही आहे.

   भारतीय गुप्तचर खात्यामध्ये दिर्घकाळ काम केलेले निवृत्त अधिकारी बी. रामन यांनी आपल्या ताज्या निबंधातून तशी शक्यता व्यक्त केली आहे. तेहरानला अलिप्त राष्ट्राच्या परिषदेल गेलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वर्तन आणि त्यांनी खूंटीस टांगून ठेवलेले पाकिस्तान भेटीचे आमंत्रण या दोन गोष्टींचा आधार घेऊन त्यांनी मध्यावधी निवड्णुकीही शक्यता शुक्रवारी लिहून टाकली. त्याच संध्याकाळी सोनिया प्रणबदांना भेटायला गेल्या. सत्ताधारी पक्षाच्या वतीने पंतप्रधान राष्ट्रपतींची भेट घेतो, पक्षाध्यक्ष नाही. पण इथे सोनिया राष्ट्रपती भवनात गेल्या. याचा अर्थच त्या घट्नात्मक कामासाठी नव्हेतर राजकीय सल्लामसलत करायला गेल्या असणार. म्हणुनच त्यांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यामध्ये ठेवण्य़ात आले आहे. कारण राष्ट्रपती म्हणून प्रणबदा राजकीय पक्षाचे हित बघू शकत नाहीत. पण गेल्या आठ वर्षात त्यांनीच प्रत्येकवेळी कॉग्रेस व युपीएला राजकीय संकटातून बाहेर काढण्याचे सर्व डाव खेळले होते. म्हणूनच मध्यावधी निवडणूकीबद्दल त्यांचा सल्ला घ्यायला सोनियाजी तिकडे गेल्या असणार. पण मोदींना गुजरातमध्ये अडकवून कॉग्रेसचा कोणता राजकीय लाभ होऊ शकतो?

   आज देशाच्या कुठल्याही भागात न जाता आणि स्वत:ला केवळ गुजरातमध्येच गुंतवून ठेवणार्‍या मोदींची लोकप्रियता सर्वाधिक आहे. त्यांना लोकसभा निवडणूकीत सर्वत्र फ़िरण्याच संधी मिळाली तर त्यात आणखीनच भर पडू शकते. पण गुजरातबाहेर त्यांना पडता आले नाही तर लोकप्रियतेचा पुरेपुर लाभही मोदी घेऊ शकणार नाहीत. आणि गुजरातच्या विधानसभा निवडणूका वार्‍यावर सोडून मोदी देशभर दौरे करणार नाहीत. म्हणूनच गुजरात विधानसभा निवडणुकी सोबतच लोकसभेच्या मध्यावधी निवडणूका घेतल्या; तर मोदी गुजरात बाहेर प्रचाराला जाऊ शकणार नाहीत. याचाच अर्थ त्यांची लोकप्रियता असली तरी तिचा पुर्ण लाभ त्यांना एकत्रित निवडणूका झाल्यास घेता येणार नाही. गुजरात जिंकल्यावर त्यांना एक सव्वा वर्षाचा अवधी मिळाला, तर ते देशभर दौरे काढून आपल्या लोकप्रियतेचा भरपुर लाभ घेऊ शकतील. त्यापासून त्यांना वंचित ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे गुजरात सोबच्या मध्यावधी लोकसभा निवडणूका होय.

   आताच लोकसभा मध्यावधी निवडणूक घेतल्यास कॉग्रेसचे आणखी दोन लाभ आहेत. एक म्हणजे अनेक घोटाळ्यामुले जी बदनामी दिवसेदिवस वाढते आहे, तिचा प्रादुर्भाव पुढल्या दिडवर्षात आणखी हानीकारक होऊ शकतो, त्यापासून मध्यावधीमुळे आपले नुकसान कमी होऊ शकेल असे कॉग्रेसला वाटते आहे. दुसरीकडे मोदी भाजपा वगळता जे अन्य विरोधक आहेत, त्यांना बेसावध गाठले तर अपुर्‍या तयारीमुळे त्यांनाही फ़ारसे यश मिळणार नाही. इतक्या अल्पावधीत तिसरी सेक्युलर आघाडी आकार घेऊ शकणार नाही, म्हणुनच ते एकत्रित निवडणूक लढू शकणार नाहीत. आणि सध्या अण्णा-रामदेव यांच्या प्रेमात पडलेल्या मतदाराला त्यांचे अनुयायी वापरू शकणार नाहीत. कारण इतक्या अल्पकाळात अण्णा टिमला आपल्या पक्षाची संघटनत्मक उभारणी करून निवडणूका लढणे अशक्य आहे. म्हणूनच त्यांच्याकडून होणारे कॉग्रेसचे नुकसानही मध्यावधीमुळे टळू शकते.

   त्याच बाबतीत सल्लामसलत करायला सोनिया राष्ट्रपती भवनात जाऊन प्रणबदांना भेटल्या असाव्यात. आणि म्हणुनच त्या भेटीचे कारण गोपनिय राखण्यात आले आहे. एकतर राष्ट्रपती अशी राजकीय सल्लामसलत करू शकत नाहीत असे आहे आणि दुसरे कारण मध्यावधी निवडणूका विरोधकांसह मोदींना बेसावध गाठण्याचा डाव आहे. आणि तसे असल्यानेच पंतप्रधानांनी पाकिस्तानचे आमंत्रण असूनही तिकडे जाण्याबद्दल व ते स्विकारण्याबद्दल एक महिना उलटून गेल्यावरही टाळाटाळ चालवली आहे. सध्याचे संसदेचे गोंधळात सापडलेले पावसाळी अधिवेशन लौकर गुंडाळण्याचे पाऊल सरकारने उचलले, तर डिसेंबर ाखेर लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे म्हणून समजावे.
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers52%5Cpaper5188.html
नरेंद्र मोदी हे नाव ऐकले, मग आपल्याला फ़क्त दंगल, जाळपोळ, रक्तपात, हिंसाचार, मुस्लिमांची कत्तल, धर्मांधता एवढ्याच गोष्टी आठवतात. कारण गेल्या दहा वर्षात आपल्या समोर मोदी यांचे असेच चित्र माध्यमातून रंगवण्यात आलेले आहे. हा कुणीतरी माथेफ़िरू हिंदू सत्ताधीश आहे आणि त्याने दंगली माजवून गुजरात या राज्यात रक्ताचे पाट वाहिले, महात्मा गांधींचे रामराज्य पार उद्ध्वस्त करून टाकले, असेच चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. पण मोदी म्हणजे फ़क्त दंगल व रक्तपातच आहे काय? या माणसाची दुसरी ओळख काहीच नाही काय? दंगल फ़क्त गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असतानाच झाली काय? तत्पुर्वी देशात कुठेच दंगली झाल्या नव्हत्या काय? आणि झाल्या असतील तर एकट्या मोदीच्याच नावावर दंगलीचे खापर फ़ोडण्याचे कारण काय? त्याचा सैतानी चेहरा सतत लोकांसमोर आणतानाच, त्याचा दुसरा उत्कृष्ठ कार्यकर्ता हा चेहरा लपवण्याचा तर त्यामागे दुष्ट हेतू नसावा काय? कोण आहे हा नरेंद्र मोदी?

2001 सालात त्याला भाजपाने गुजरातचा मुख्यमंत्री बनवले. त्याआधी तब्बल तीस वर्षे, त्याने त्या पक्षात राहून कसलीही अपेक्षा न बाळगता काम केले. कधी त्याने कुठली उमेदवारी मागितली नाही, की निवडणूक लढवली नाही. मिळेल ते पद स्वीकारून पक्षाचे काम केले. जेव्हा मुख्यमंत्री झाला, त्यानंतरच आयुष्यात पहिली निवडणूक लढवली. जेव्हा सत्ता मिळाली आणि ती राबवण्याचा अधिकार हाती आला, तेव्हा त्याच माणसाने जनतेची सत्ता जनतेच्या हितासाठी किती काटेकोर वापरली जाऊ शकते, याचा अपुर्व धडा निर्माण करून ठेवला आहे. एका बाजूला पक्षातील सत्तालंपटांनी केलेली अडवणूक, दुसरीकडे विरोधकांचे डावपेच, तिसरीकडे माध्यमांनी त्यांची बदनामी करण्याची मोहिमच चालवली. पण खरा कार्यकर्त्याचा पिंड असल्याने मोदी सर्वांना पुरून उरले. त्यांनी गुजरात दहा वर्षात देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवून दाखवले. कुठल्याही राज्यातला मुख्यमंत्री, मंत्री सतत अडचणींचा पाढा वाचत असतो. पण मोदी यांनी जी सत्ता, अधिकार व साधने हाताशी होती; त्यांचा चतुराईने वापर करून विकासाचा नवा आदर्श देशासमोर मांडला. त्यामुळेच त्यांची बदनामी करणार्‍यांना आता त्याच मोदीच्या यशस्वी विकासाचा अनिच्छेने का होईना पाढा वाचावा लागतो आहे.

पहिली गोष्ट म्हणजे मोदी यांनी पक्ष, आमदार किंवा आणखी कोणापेक्षा सामान्य जनतेच्या विश्वासाला प्राधान्य दिले. तिच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले. विकासातून ज्या जनतेच्या आकांक्षा पुर्ण करायच्या असतात, तिलाच विकासकामात सहभागी करून घेतले. स्वत: दिर्घकाळ सत्तेपासून दुर राहून काम केलेले असल्याने, त्यांना इच्छाशक्तीची ताकद चांगलीच ठाऊक होती. मग त्यांनी प्रथम विकासाचे स्वप्न जनतेला दाखवून, त्यासाठी तिच्यात कार्यासक्ती उत्पन्न केली. विकास ही कोणी कोणाला घातलेली भिक नसते. ते कोणी कोणावर करायचे उपकार नसतात. ज्यांचा विकास, प्रगती करायची असते, त्यांचा आधी अशा कल्पनेवर विश्वास असायला हवा. त्यात त्यांचाच सहभाग असायला हवा. तरच अशा विकासाला गती येत असते. ती सफ़ल होऊ शकत असते. सामजिक पुरूषार्थ त्यात महत्वाची कामगिरी बजावत असतो. ज्यांनी थेट नेतागिरी केली व जनतेच्या भावनाच जाणून घेतल्या नाहीत, त्यांना हे कधीच कळू शकत नाही. मग ते प्रेषित, उद्धारकर्ता होऊन जनतेसमोर येत असतात. पण ते जनतेला सोबत घेऊन काम करू शकत नाहीत. तिला सहभागी करून घेऊ शकत नाही. पर्यायाने विकास ही सरकारी योजना होते आणि जनता त्यापासून अलिप्त रहाते.

मोदी हा मुळातच कार्यकर्ता असल्याने, त्यानी थेट जनतेला सरकारी विकासात सामावून घेण्याची पावले उचलली. प्रशासनाला त्या पद्धतीने काम करायला भाग पाडले. योजना, विकासाचे प्रकल्प हे सरकारच्या समाधानासाठी, नेत्याच्या महत्वाकांक्षेसाठी नसतात, तर जनतेच्या गरजा पुर्ण करण्यासाठी व तिच्या समस्या सोडवण्यासाठी असतात. म्हणुनच प्रत्येक पातळीवर त्याच जनतेला सोबत घेणे व विश्वासात घेणे अगत्याचे असते. त्याचे दुहेरी फ़ायदे असतात. एक म्हणजे त्यातून योजनेचा लोकांना कुठला त्रास होऊ शकतो, त्याची पुर्वकल्पना येते आणि त्यांचा विरोध होण्याआधीच त्यांच्या तक्रारी दुर केल्या जाऊ शकतात. दुसरीकडे अशा सहभागामुळे लोकाचे सहकार्य योजनेला वेग आणू शकते. ती योजना त्यांची व त्यांच्याच भल्यासाठी असल्याची खात्री असल्याने, सामंजस्याने काम सुरू होते व चालते. त्यात म्हणुनच मोदी यांनी स्थानिक कार्यकर्त्याला सामावून घेण्यात पुढाकार घेतला. कसलाही प्रशासकिय अनुभव गाठीशी नसताना मोदी जे काम अवघ्या दहा वर्षात जे करू शकले, तेच प्रदिर्घ प्रशासकिय अनुभव पाठीशी असताना, शरद पवार महाराष्ट्रात वीस पंचवीस वर्षात का करू शकले नाहीत, याचे उत्तर कार्यकर्ता या एकाच शब्दात सामावले आहे. पवार आरंभी काही काळ कार्यकर्ता होते. पण त्यांना कोवळ्य़ा वयात नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यावर आपले कार्यकर्तापण ते साफ़ विसरून गेले. सत्तेवर मांड ठोकण्याच्या नादात ते सत्तेचे गुलाम बनून गेले. ज्या जनतेचे प्रतिनिधीत्व करत होते, तिला विसरून सत्ता व प्रशासनावर विसंबून कारभार करत गेले. आपण लोकांचे भवितव्य घडवतो-बिघडवतो अशा मस्तीत वागू लागले. त्यांनीच स्वत:मधला कार्यकर्ता मारून टाकला. उलट मोदी यांनी सर्वंकष सत्ता हातात आल्यावर देखील स्वत:मधला कार्यकर्ता जीवापाड जपला जोपासला आहे. तिथेच सगळा फ़रक पडतो. सत्तेने पवारांचे कर्तृत्व झाकोळून टाकले तर सत्तेने मोदीमधल्या कार्यकर्त्याला नवी झळाळी आणली.

पवार दिर्घकाळ देशाच्या पंतप्रधान पदावर डोळा ठेऊन आहेत. त्यासाठी अनेक राजकीय कसरती करत आहेत. पण महाराष्ट्रात देखील त्यांना आपली निर्विवाद नेतृत्व, लोकप्रियता प्रस्थापित करणे शक्य झाले नाही. राज्याबाहेर त्यांना आपला प्रभाव पाडता आलेला नाही. उलट एकाच राज्यात यशस्वी काम करताना आणि देशभर बदनामीच्या मोहिमा राबवल्या जात असताना, मोदी यांनी आपल्या कर्तृत्व व कामाच्या भांडवलावर, देशात स्वत:ची लोकप्रियता संपादन केली आहे. उद्योगपतींच्या मागे धावताना पवार आपला लोकनेता हा चेहरा गमावून बसले. तर लोकांच्या मागे धावताना मोदी यांनी लोकनेता बनून उद्योगपतींचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. मुकेश अंबानी, रतन टाटा यांच्यासारखे नामवंत मोदींचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवू लागले आहेत. ही किमया मोदी नावाच्या नेत्याची, मुख्यमंत्र्याची नसून, त्याने उरात जपलेल्या कार्यकर्त्याची आहे. फ़रक समजून घेण्यासारखा आहे. आपल्यातला कार्यकर्ता पवारांनी मारून टाकल्यामुळे आज त्यांना निवडुन येणारे उमेदवार शोधावे लागतात. उलट मोदींची कहाणी आहे. जे मोदींसोबत असतात ते निवडून येणार हे ठाऊक असल्याने, ज्यांना निवडून यायचे आहे, त्यांना मोदींच्या सोबत रहावे लागते.

सांगायचा मुद्दा इतकाच, की जिथे कार्यकर्ता संस्कृती प्रभावी आहे, तिथे विकास होतो आहे व भ्रष्टाचाराची प्रकरणे वेसण घातल्यासारखी मर्यादेत राहिली आहेत. जनजीवन सुसह्य झालेले आहे. सेक्युलॅरिझम, जातियवाद असल्या गोष्टीचे पाखंड त्यावर कुरघोडी करू शकलेले नाही. नितीशकुमार यांना भाजपाची सोबत केल्याने निवडणुका जिंकण्यात अडचण आली नाही. मोदींवर दंगलीचे आरोप असूनही त्यांचे नाव पंतप्रधान पदासाठी घेताना कोणाला अपराधी भावनेने पछाडलेले नाही. जरात विकासाच्या मार्गावर धोडदौड करतो आहे. आणि नेमकी उलट स्थिती इतर राज्यात आहे, तिथे कार्यकर्ता संस्कृतीचा र्‍हास झाला आहे. महाराष्ट्रासारखे दिर्घकाळ प्रगत असलेले राज्य, कार्यकर्ता प्रभावहीन झाल्यामुळे व दलाल, ठेकेदारांचे साम्राज्य पसरल्याने रसातळाला चाललेले आहे. हे आजचे दाखले आहेत. म्हणुनच पुन्हा कार्यकर्ता संस्कृतीची जोपासना आवश्यक झाली आहे. फ़क्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातच नव्याने कार्यकर्ता घडवण्याची गरज निर्माण झाली आहे. आपले दुर्दैव असे की कार्यकर्त्याची व्याख्या आज सैतानाकडून समजून घेण्याची वेळ आपल्यावर आली आहे. कसा असतो कार्यकर्ता? तो कसा बिघडवला जाऊ शकतो?